Komal Parab, Tejashwi Shinde First in Slogan Writing in District Level Painting Competition at Vengurle…
जल संवाद कार्यशाळेला उस्फूर्त प्रतिसाद..
वेंगुर्ले | प्रतिनिधी : भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाचे नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे दोन दिवशीय जलसंवाद कार्यशाळा आणि जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा व स्लोगन लेखन स्पर्धा संपन्न झाल्या. या सगळ्या उपक्रमास जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
राष्ट्रीय जल मिशन अंतर्गत ‘कॅच दी रेन ३.०’ नुसार ‘जेव्हा पाऊस पडेल, जिथे पडेल, जसा पडेल’ त्या पाण्याचं संवर्धन करणे, त्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यासाठी संपूर्ण भारतभर असे उपक्रम सुरू आहेत.त्याचाच एक भाग म्हणून नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय जलसंवाद मार्गदर्शन कार्यशाळा व त्याचबरोबर चित्रकला आणि स्लोगन लेखन स्पर्धेच्या माध्यमातून याविषयी माहिती देणारे जनजागृती उपक्रम पार पडले,या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करून प्रा. वैभव खानोलकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर,सचिव प्रा. सचिन परुळकर, संजय पाटील,महेश राऊळ, दशावतार कलावंत शाम जाधव, रितिका मेस्त्री, ओंकार राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.
जलसंवाद कार्यशाळेत पहिल्या दिवशी प्रा. वैभव खानोलकर यांनी पावसाच्या पाण्याचे महत्व, पाण्याचे स्त्रोत, उपलब्ध जलसाठा आणि भविष्यातील परिस्थिती याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तर प्रा.बी.टी.खडपकर यांनी पाणी टंचाईचे आव्हान ,त्यावरील उपाय आणि त्यासाठी घेण्यात येणारी काळजी यासाठी युवा वर्गाने पुढे येऊन कार्य करावे असे कळकळीचे आवाहन केले, तर डॉ.मिलन नाईक यांनी मानवी जीवनासाठी पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करताना ‘जल है तो कल है’ याविषयी युवकांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी खर्डेकर महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. बी. चौगले यांनी पाण्याचे राष्ट्रीयकरण,आंतरराष्ट्रीय स्तरावर पिण्याच्या पाण्याची स्थिती,पाणी अडवण्याचे तंत्र आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम विशद करत विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले. कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमचे जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ यांनी भौगोलिक दृष्टिकोनातून मनुष्याचा चुकामुळे पर्यावरणाच्या ऱ्हास कसा होत आहे आणि पाण्याअभावी प्राण्यांची होणारी अहवेलना आणि त्यासाठी काय उपाय योजना करता येईल याविषयी विद्यार्थ्यांना संवेदनशील असे मार्गदर्शन केले.
या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी ‘जल है तो कल है’ या विषयावर जिल्हास्तरीय चित्रकला तर ‘पाणी’ या विषयावर स्लोगन लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
चित्रकला स्पर्धा
प्रथम:कोमल भरत परब (परबवाडा,वेंगुर्ले)
द्वितीय:कीर्ती मिलिंद तळकटकर(मळगाव, सावंतवाडी)
तृतीय: दिक्षा राजन पालकर(पाल,वेंगुर्ले)
उत्तेजनार्थ प्रथम:वासुदेव संतोष धुरी (असोली, वेंगुर्ले)
उत्तेजनार्थ द्वितीय:किंजल चद्रहास नार्वेकर (उभादांडा)
उत्तेजनार्थ तृतीय: करणं लक्ष्मण करगुटकर (वेंगुर्ले)
उत्तेजनार्थ चतुर्थ: श्रद्धा शाम जाधव(गोवेरी,कुडाळ)
स्लोगन लेखन स्पर्धा
प्रथम:तेजस्वी गजानन शिंदे (बोर्डवे, कणकवली),
द्वितीय: पी.एस.कौलापुरे (शिरोडा,वेंगुर्ला),
तृतीय: राशी योगेश सतोसे(कुडाळ)
उत्तेजनार्थ प्रथम: दिव्या मोहन साटेलकर (वेंगुर्ला)
उत्तेजनार्थ द्वितीय:दिक्षा राजन पालकर (पाल)
चित्रकला स्पर्धेचे परीक्षण चित्रकार गणेश कुंभार आणि कृष्णा सावंत यांनी तर स्लोगन लेखन स्पर्धेचे संजय पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी तर आभार ओंकार राऊळ यांनी मानले.












