ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र करीत तालुका संघटक जितेंद्र दवंडे शिवसेनेत दाखल
मंडणगड प्रतिनिधी : मंडणगड तालुक्यात ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका प्रमुखांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पक्षाला धक्का देत तालुका संघटक जितेंद्र दवंडे यांनी आज मुंबई पालखी निवासस्थानी शिवसेनेचा ध्वज हाती घेतला. त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असून बाणकोट पंचायत समिती निवडणुकीत देखील या प्रवाशाने निर्णायक बदल होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केले. दवंडे हे मागील काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुक्यातील महत्त्वपूर्ण चेहरा असून कुणबी समाजाच्या सहसचिव पदावर कार्यरत असल्याने सामाजिक राजकारणात देखील मोठी उलथापालथ होणार असल्याचे म्हटले जात आहे. सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोठा प्रभाव असणार्या सामाजिक नेत्याच्या प्रवेशाने शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. पक्ष सोडण्याचे कारण विचारले असता मी पक्षावर नाराज नसून तालुका पक्ष श्रेष्ठींवर नाराज असून नेत्यांच्या कार्यप्रणालीवर व मनमानी कारभारामुळे केवळ पदावर रहाण्यात रस नसल्याने पदाचा राजीनामा देत या प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले. केवळ भावनिक राजकारण करून समजाला व तालुक्यातील जनतेला विकासापासून वंचित ठेवण्याचे पाप माझ्या हातून होणार नाही. म्हणून नामदार श्री. योगेशदादा कदम यांच्या विकासात्मक धोरणावर प्रेरित होऊन पक्षाचे हात बळकट करण्यासाठी व सर्वांगीण विकासाचा मुद्दा हाती घेऊन प्रवेश करीत असल्याचे सांगितले. नामदार योगेशदादा कदम यांच्या म्हणण्यानुसार तालुक्यात सर्वच्या सर्व पंचायत समिती सदस्य व सर्वच जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी नक्कीच आमचा प्रयत्न राहील. श्री. दवंडे यांच्या समवेत संपूर्ण बोरखत ग्रामस्थ,महिला मंडळ व मुंबई मंडळाने.ना.श्री.योगेश कदम यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला. ना योगेश कदम यांनी तात्काळ दवंडे यांची तालुका समन्वय पदी नियुक्ती पत्र देत नियुक्ती करण्यात आली. यावेळी तालुका श्री. प्रताप घोसाळकर, उपतालुका प्रमुख श्री. संजीव येसावरे, तुळशी गण विभाग प्रमुख श्री. संजय शेडगे, तालुका सचिव श्री. सिद्धेश देशपांडे, माजी तालुका समन्वयक श्री. हेमंत मोदी, बोरखत ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश घाणेकर, सल्लागार श्री. सदानंद जोशी, मुंबई मंडळ अध्यक्ष श्री. रविंद्र माळी, सल्लागार श्री. काशीनाथ महाडिक, महिला मंडळ अध्यक्षा व सर्व महिला मंडळ आदी उपस्थित होते.










