मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांचा इशारा
चिपळूण (प्रतिनिधी) : परप्रांतीय रिक्षाव्यवसायिकांनी मुबईमध्ये आंदोलन करावेच!, त्यांना चोख उत्तर दिले जाईल… यांच्या आंदोलनाचा काडीचाही फरक पडणार नाही. जर वेळ आली तर रत्नागिरी जिल्ह्यातून किमान हजार ते दीड हजार रिक्षा मुबईमध्ये घेऊन जाणार असल्याचे मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रमध्ये राहून मराठी न बोलता येणाऱ्या रिक्षा व्यवसायिकांना परिवहन विभागाने दणका दिला आहे. या विरोधात मुबईमध्ये रिक्षा वाहतूक बंद करण्याचा इशारा परप्रांतीय रिक्षा चालक मालक यांनी दिला आहे. शिवाय आम्ही मराठी बोलणार नाही अशी उर्मट भाषा हे परप्रांतीय करीत असून ४ मे रोजी बंद करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून मराठी जनतेची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली आहे. या संदर्भात मनसेचे रत्नागिरी जिल्हा वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना मुबईमध्ये मराठी जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून किमान हजार ते दीड हजार रिक्षा मुबईमध्ये नेण्याचे स्पष्ट केले आहे. आमच्या राज्यात राहून पोट भरणाऱ्या परप्रांतीयांनी आम्हालाच जर आव्हान देत असतील तर त्याचा आता कायमचा बंदोबस्त केला जाईल. त्यानी ४ मे ला बंद करावाच, रत्नागिरी जिल्ह्यातील किमान हजार ते दीड हजार रिक्षा मुबईकरांसाठी जातील आणि तशी तयारीही करण्यात आली आहे. या रिक्षाचा जाण्यायेण्याचा खर्च मनसे वाहतूक सेनेच्या माध्यमातून केला जाणार आहे, असे राजू खेतले यांनी सांगितले. आम्ही मुबईमध्ये जाणाऱ्या रिक्षाची नोंदणी सुरू केली आहे. आज दोन दिवसात किमान सातशे ते साडेसातशे रिक्षा व्यावसायिकांनी नोंद केली आहे. यासाठी जिल्हा परिवहन विभागाची परवानगी घेतली जाणार आहे. मुंबईकराची कुठेही गैरसोय होणार नाही आणि मराठी रिक्षा व्यावसायिकांनाही आमच्या खंबीरपाठबलामुळे बळ मिळेल असा आशावादही मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी व्यक्त केला. मराठी आणि मराठी माणसांसाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ, मात्र आमच्या भाषेला आणि मराठी माणसांना धक्का लागून देणार नाही. याची मुजोरी मोडून काढण्याची हीच वेळ आता आली आहे. यासाठी जे जे मराठी रिक्षा चालक-मालक आहेत त्यानी मुबईमध्ये जाण्यासाठी नावनोंदणी करावी, अशी विनंती करताना मुबई ही मराठी माणसाची आहे त्यामुळे या मुबईसाठी मुबईतील मराठी माणसांसाठी रत्नागिरीतील रिक्षाव्यावसायिक न थकता सेवा करेल, असा आशावाद राजू खेतले यांनी व्यक्त केला आहे.












