मंथन : लो. टिळक पुरस्कार ‘लोकमान्य’ नेतृत्वाला

स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दि. १ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. लाखो पुणेकरांच्या साक्षीने आणि राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत मोदींना गौरविण्यात आले. रोहित, गीताली, प्रणिती हे टिळक कुटुंबीय व्यासपीठावर उपस्थित होते. देशातील कोट्यवधी जनतेने ‘लो. टिळक पुरस्कार प्रदान कार्यक्रम’ टीव्हीच्या पडद्यावर पाहिला. पण मोदींना पुरस्कार म्हटल्यावर ज्यांचे पोट दुखू लागले, त्या विरोधी पक्षांनी रस्त्यावर निदर्शने करून आपल्या नाकर्तेपणाचे प्रदर्शन केले.

संसदेचे पावसाळी अधिवेशन दिल्लीत चालू आहे. पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी स्वत: विरोधी बाकांवर बसलेल्या सोनिया गांधींकडे गेले व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जो दिलदारपणा पंतप्रधानांकडे आहे, तो विरोधी पक्षांकडे का नाही?

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा हे राजकीय व्यासपीठ नाही. हा सरकारी कार्यक्रमही नाही. लोकमान्य टिळकांच्या नावाने स्थापन केलेल्या स्मारक समितीच्या वतीने देशातील नामवंत व्यक्तीला, ज्याने विविध क्षेत्रांत लक्षणीय व उत्तुंग कामगिरी बजावली आहे किंवा त्या व्यक्तीचे राष्ट्रीय पातळीवर मोठे योगदान आहे, हे पाहूनच हा पुरस्कार दिला जातो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नातू जयंतराव टिळक यांनी हा पुरस्कार चाळीस वर्षांपूर्वी सुरू केला. जयंतराव टिळक उच्चशिक्षित, प्रतिष्ठित, गुणसंपन्न असे व्यक्तिमत्त्व होते. लोकमान्यांनी स्थापन केलेल्या केसरीचे दैनिकात रूपांतर जयंतरावांनी केले. जयंतराव टिळक हे महाराष्ट्राचे भूषण होते. ते तीन टर्म खासदार होते. पुण्यातून राज्य विधानसभेवर संयुक्त महाराष्ट्र समितीचे आमदार म्हणून निवडून गेले होते. बॅ. ए. आर. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात ते ऊर्जामंत्री होते. राज्य विधान परिषदेचे ते सोळा वर्षे सभापती होते. विकासाची दृष्टी असणारे बुद्धिमान व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. त्यांचे चिरंजीव केसरीचे संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांनी जयंतरावांची परंपरा तेवढ्याच जोमाने पुढे चालू ठेवली आहे. लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी निवड करताना स्मारक समितीने कधीच राजकीय दृष्टिकोनातून विचार केलेला नाही. इंदिरा गांधी, प्रणव मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, शरद पवार, बाळासाहेब देवरस अशा दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. मग या वर्षीचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, 

समाजवादी आणि डाव्या संघटनांनी नाके कशासाठी मुरडली? 

नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय पातळीवर उदय झाल्यापासून देशाच्या राजकारणाचा पोतच बदलला. देशाचे पंतप्रधान म्हणून जनतेने त्यांना सलग दुसऱ्यांदा निवडून दिले. जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचावण्याचे सारे श्रेय मोदी यांच्या कार्यकर्तृत्वालाच आहे. जगात सर्व देशांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. कोविड काळात अमेरिकेसह युरोपातील अनेक संपन्न देश आर्थिकदृष्ट्या ढासळले होते. पण मोदींनी जे भारतासाठी व इतर देशांना मदत देण्यासाठी जे काम केले त्याला तोड नव्हती. अडीच कोटी लसींचे वाटप देशवासीयांना विनामू्ल्य करून लक्षावधी जनतेचे प्राण त्यांनी वाचवले. न्यायालयीन सर्व अडथळे दूर झाले व त्यांच्या काळातच राम मंदिराच्या उभारणीला वेगाने सुरुवात झाली. जम्मू काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ३७०व्या कलमाचे कवच रद्द करण्याचा धाडसी निर्णय तेच घेऊ शकले. देशाची अर्थव्यवस्था त्यांनी जगात दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणलीच, पण आता पुढील पाच वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा त्यांनी संकल्प बोलून दाखवला आहे. तिहेरी तलाक पद्धती रद्द करून लक्षावधी मुस्लीम महिलांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. ‘सबका साथ सबका विकास’ हे सूत्र घेऊन त्यांनी देशात विकासकामांचा धडाका लावला म्हणूनच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराला पात्र ठरले. गेल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या विकासकामांतूनच लोकमान्यता मिळवली. वंदे भारत रेल्वे ही त्यांचीच देशवासीयांना देणगी आहे. बुलेट ट्रेनचे काम वेगाने चालू आहे. डिजिटल पेमेंट पद्धती अगदी रस्त्यावरच्या भाजीवाल्यापर्यंत पोहोचली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि अर्थव्यवस्था अशा सर्व क्षेत्रांत भारताची घोडदौड चालू आहे. म्हणूनच देशाच्या महानायकाला ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ मिळतो ही देशवासीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. पुरस्काराची रक्कम ‘नममि गंगा’ प्रकल्पाला देण्याचे त्यांनी जाहीर केले, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहेच. पण वाराणसी व पुणे यांचे नाते कसे जुने आहे, हेही आवर्जून सांगितले.

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. राजकारण हे निवडणुकीच्या मैदानात असावे, सत्कार समारंभात नसावे हाच संदेश लोकमान्य टिळक पुरस्काराने दिलेला आहे. संसदीय लोकशाहीत राजकीय सभ्यता पाळली पाहिजे. त्याचेच दर्शन पुण्यात मोदींना दिलेल्या पुरस्काराच्या वेळी दिसून आले. मोदींनी पवारांशी हस्तांदोलन केले, पवारांनी मोदींच्या पाठीवर थाप मारली. मोदींनी अजित पवारांशी हात मिळवला आणि त्यांची पाठ थोपटली. एकनाथ शिंदे यांनी मोदींच्या कार्याची प्रशंसा केली आणि मोदींनीही एकनाथ शिंदेंनी आपला विश्वास सार्थ केल्याचे सूचित केले.

सुशीलकुमार शिंदे हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलपती आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या शरद पवारांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डी.लिट पदवीने सन्मानित केले आहे. हे दोघेही माजी मुख्यमंत्री आहेत.

शरद पवारांच्या पंचाहत्तरीला दिल्लीत झालेल्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, प्रणव मुखर्जी आणि मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला उद्धव व राज ठाकरे उपस्थित होते. तेव्हा कुणाला कुणाबद्दल आक्षेप घ्यावासा वाटला नाही, मग पवारांनी मोदींच्या पुरस्कार कार्यक्रमाला जायला नको होते, असा उबाठा सेनेने टाहो का फोडला?

नरेंद्र मोदींच्या स्वागताला अजित पवार, सत्कार होताना शेजारी शरद पवार, मंचावर सुशीलकुमार शिंदे आणि बाहेर काळे झेंडे दाखवायला काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. यातून काही तरी शिका, नाहीतर आयुष्यभर झेंडेच हाती घ्यावे लागतील…

sukritforyou@gmail.com

sukrit@prahaar.co.in