वीर सावरकर यांच्याबद्दल पहा काय म्हणाले बाळ माने
रत्नागिरी : कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले. त्यामुळे रत्नागिरीत काल भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी युवा अध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी आमदार तथा भाजपाचे रत्नागिरी विधानसभा निवडणूक प्रमुख बाळ माने यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून निषेध नोंदवला.
वि. दा. सावरकर हे वीर नव्हते. जर मी प्रभारी असतो तर सुवर्ण विधानसभेत लावण्यात आलेला त्यांचा फोटो काढून टाकला असता, असं वक्तव्य मंत्री खर्गे यांनी केलं. यामुळे देशभरात शुक्रवारी भाजपा युवा मोर्चातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार बाळ माने म्हणाले की, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान उल्लेखनीय आहे. वीर सावरकरांचा अपमान आम्ही कोणत्याही स्थितीत सहन करणार नाही. रत्नागिरी ही सावरकरांची कर्मभूमी आहे. त्यामुळे त्यांचा सातत्याने अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि सहयोगी पक्षाच्या नेत्यांना आजच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही निर्वाणीचा इशारा देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाला मिळणाऱ्या विजयापासून जनतेचे लक्ष विचलित व्हावे याकरिता कॉंग्रेसने स्वातंत्र्यवीरांना टीका केली आहे. रत्नागिरी ही स्वातंत्र्यवीरांची कर्मभूमी आहे. आज आम्ही तीव्र शब्दांत धिक्कार करतोय. सावरकर ही आमची सर्वांची अस्मिता आहे. कॉंग्रेसला योग्य शब्दांत आज इशारा देत आहोत. सावरकरांचे हिंदुत्व हेच आमचे हिंदुत्व आहे. त्याला कोणी गालबोट लावत असेल तर भाजपा गय करणार नाही. स्वातंत्र्यवीरांचे हिंदुत्वाचे विचार जनतेला प्रेरणादायक आहेत.
या वेळी युवा मोर्चा प्रदेश चिटणीस विक्रम जैन, शहराध्यक्ष राजन फाळके, शहर सरचिटणीस मंदार खंडकर, जिल्हा चिटणीस राजू भाटलेकर, राजापूर (पश्चिम) महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. सुयोगा जठार, पदवीधर सेलचे जिल्हा संयोजक मनोज पाटणकर, व्यापारी आघाडीचे प्रमोद खेडेकर, संदीप (बाबू) सुर्वे, बापू गवाणकर, राजू महाकाळ, युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धाय मयेकर, युवा मोर्चा रत्नागिरी विधानसभा संयोजक निरंजन जठार, भाजयुमो जिल्हा चिटणीस सोहम खानविलकर व पमू पाटील, युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी अतिफ काझी, शिवानी दुदम, चिन्मय शेट्ये, गौरव जाधव यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला.












