रत्नागिरी जिल्ह्यात हूडहुडी; दापोली गारठले

 

रत्नागिरी : उत्तरेकडील थंड वार्‍याच्या प्रवाहामुळे राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा गारठाला असून ‘मिनी महाबळेश्वर’ मानल्या जाणार्‍या दापोलीतही मोठ्या प्रमाणात जाणवला असून, दापोलीचे किमान तापमानाची नोंद 7.8 अंश इतकी नोंदवली गेली आहे.

दि. 14 डिसेंबरपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल घडत असून 14 डिसेंबर रोजी कमाल 32.5 अंश, तर किमान तापमान 10.8, 15 डिसेंबर रोजी 31.9 किमान 10.5, 16 रोजी कमाल 33.2, तर किमान 9.0 अंश सेल्सिअस, 17 रोजी कमाल 31.9, तर किमान 7.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. तापमानातील या बदलामुळे दापोलीत सुरू झालेली थंडी काही काळ गायब झाली होती. आता पुन्हा थंडीचा जोर वाढू लागला आहे.

दि. 16 डिसेंबरपासून थंडीची पुन्हा सुरुवात झाली आहे. यापूर्वी दापोली येथे 2 जानेवारी 1991 मध्ये 3.4 अंश सेल्सिअस इतके निचांकी तापमान नोंदविले गेले होते तर त्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे 3 जानेवारी 1991 रोजी ते 3.7 अंश सेल्सिअस इतके किमान तापमानाची नोंद झाली आहे. दि. 9 फेब्रुवारी 2019 या वर्षी 4.5 अंश इतके नीचांकी नोंदविले गेले होते.

हीच स्थिती रत्नागिरी जिल्ह्याची असून आंब्याचा मोहोर बाहरला आहे.