उदय रावणंग यांनी दिव्यांगासाठी केलेले काम जिल्ह्यासाठी आदर्श – मनोज बावधनकर
गुहागर | प्रतिनिधी : सातत्याने गेली २० वर्ष नाविन्यपूर्ण काम करत दिव्यांगांचे जीवन सुलभ व्हावे यासाठी उदय रावणंग काम करत आहेत. त्याबद्दल गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे दिल्या जाणऱ्या स्व. सुभाष गोयथळे जीवन गौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. असे पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष मनोज बावधनकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
पत्रकार दिनानिमित्त गुहागर तालुका पत्रकार संघाने स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला पोलीस उपविभागीय अधिकारी राजमाने, शिवसेना नेते व माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, गटविकास अधिकारी केळस्कर, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, तहसीलदार परिक्षित पाटील, गुहागर नगरपंचायतचे अनंत मोरे, पत्रकार व भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, लायन्स क्लबचे डॉ. अनिकेत गोळे, संतोष वरंडे, शामकांत खातू, मनिष खरे, प्रसाद वैद्य, डॉ. मयुरेश बेंडल, मेडिकल असोसिएशनचे डॉ. मंदार आठवले, डॉ. निलेश ढेरे, भाजपचे माजी गटनेते उमेश भोसले, ज्ञानरश्मि वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर संचालक प्रमुनाथ देवळेकर, बाबासाहेब राशिनकर, कवी ज्ञानेश्र्वर झगडे, ग्रंथपाल सौ. सोनाली घाडे, कृषी अधिकारी व आफ्रोहचे राज्य पदाधिकारी गजेंद्र पौनिकर, श्याम आठवले, आदी विविध क्षेत्रातील मंडळींनी गुहागर पत्रकार संघाच्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन राजेश बेंडल यांनी दिपप्रज्वलनाने केले. मनोगत व्यक्त करताना बेंडल म्हणाले की, गुहागर शहरातील पत्रकार गेली २५ /३०वर्ष पत्रकारिता करत आहेत. चौथा स्तंभ म्हणून त्यांनी हे सर्वजण चांगल्या पध्दतीने काम करत आहेत हे राजकीय क्षेत्रात असल्याने सातत्याने मी अनुभवले आहे. पत्रकार संघ या संस्थेद्वारे देखील त्यांनी अनेक वेगवेगळे उपक्रम केले. समाजात सकारात्मक विचार रुजविण्याचे त्यांचे काम आचार्य बाळशास्त्र जांभेकर यांच्या भूमिकेला धरुन आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी राजमाने म्हणाले की, पोलीस असो किंवा पत्रकार असो वस्तुस्थिती मांडण्याचे काम करत असतो. न्यायदानाचे काम न्यायालयाचे आहे. मात्र हल्ली पत्रकारीतेमध्येही स्पर्धा असल्याने पहिल्यांदा प्रसिध्द होण्यासाठी अपूऱ्या माहितीच्या आधारे बातमी दिली जाते. ही गोष्ट पत्रकारिता व समाज दोघांचे नुकसान करणारी आहे. त्यामुळे विविध बाजुंची खातरजमा करुनच बातमी प्रसिध्द करावी असे आवाहन त्यांनी केले.
गटविकास अधिकारी केळस्कर, नगरपंचायतीचे अनंत मोरे, पोलीस निरीक्षक सावंत यांनी देखील पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पत्रकार मनोज बावधनकर म्हणाले की, १९९४ पासून गेल्या ३० वर्षात पत्रकार संघाद्वारे आम्ही विविध उपक्रम यशस्वी केले. त्याची पोचपावती म्हणून आदर्श पत्रकार संघ हा पुरस्कारही आम्हाला मिळाला. १० वर्षांपूर्वी आमचे ज्येष्ठ सहकारी स्व. सुभाष गोयथळे यांच्या नावाने आम्ही सार्वजनिक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार देण्याची सुरवात केली. तीन वर्षांचा अपवाद वगळता कै. गजानन बेंडल, राजन दळी, यशवंत बाईत, गफार मेमन, नाना पाटणकर, नासिमशेठ मालाणी, राजेश शेटे यांना पुरस्कार दिले. यावर्षी गुहागर तालुका अपंग पुनवर्सन संस्थेचे उदय रावणंग यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर एका विशेष समितीद्वारे स्व. वासुदेव गणेश निमकर आदर्श सरपंच या पुरस्कारासाठी दोन सरपंचांची निवड करण्यात येणार आहे. हे तिन्ही पुरस्कार गुहागर पोलीस मैदानात मोठा कार्यक्रम घेवून फेब्रुवारी अखेरपर्यंत देण्यात येतील.











