मोडकाआगर | वार्ताहर : गेली अनेक वर्ष ग्रंथालये ही शासनाकडून दुर्लक्षित राहिली आहेत. शासनमान्य ग्रंथालये चालवताना अनेक समस्या येतात. कर्मचाऱ्यांना अपुरे वेतन, पुस्तकांच्या वाढत्या किमती, निधी अभावी सुविधांचा अभाव, कमी झालेले लोकांचे वाचन अशा गंभीर समस्यांना ग्रंथालयांना सामोरे जावे लागत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माननीय डॉ गजानन कोटेवार यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे ४८ वे वार्षिक अधिवेशन श्रीपूजा हॉल पाटपन्हाळे येथे ज्ञानरश्मि वाचनालय गुहागर यांनी आयोजित अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे,सहाय्यक ग्रंथालय संचालक कोकण भवन प्रशांत पाटील, निरिक्षक जिल्हा ग्रंथालय अधिकारी हेमंत काळोखे, जेष्ठ उद्योजक श्रीराम खरे, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे, ज्ञानरश्मि वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांचे प्रमुख उपस्थितीत होते.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यानी तुटपुंजा वेतनामध्ये कर्मचारी काम करतात आणि ग्रंथालय चालक आपल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न करत असुन या प्रयत्नांना शासनाची जोड मिळणे गरजेचे आहे . अनेक वर्षात ग्रंथालयांचा वर्ग बदल झालेला नाही. आज ना उद्या आपल्याला बऱ्यापैकी वेतन मिळेल या आशेवर ग्रंथालय कर्मचारी आपले काम करीत आहेत.
ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित झालेली नाही. महाविद्यालयातील आणि माध्यमिक शाळेतील ग्रंथपालाना शासनाने वेतनश्रेणी मंजूर केली आहे पण शासनमान्य अनुदानित ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना मात्र वेतनश्रेणी दिली जात नाही.
शासन अनुदान देताना दहा टक्के रक्कम ही संबंधित ग्रंथालयानी स्वनिधीतून खर्च करावी अशी अट घालते. यात बदल होऊन शंभर टक्के अनुदान ग्रंथालयांना दिले गेले पाहिजे असेही बोलले. केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे ग्रंथालयांच्यासाठी आलेल्या निधीचाही अजून विनियोग करण्यात आलेला नाही. केंद्र सरकारकडून आलेली रक्कम राज्यातील जी ग्रंथालये उत्तम पद्धतीने कार्य करीत आहे त्यांना वितरित करावा अशी मागणीही त्यांनी केली.
या अधिवेशन पुरस्कार वितरण, श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर कॉलेजचे सांस्कृतिक कार्यक्रम कोळीनृत्ये, ड्रामाडान्स, जाकडी, फ्युजून डान्स, लावणी, , ग्रंथदिंडी,मनाली बावधनकर याचे मराठी भाषेला अभिजात दर्जा आणि ग्रंथालय व्याख्यान व श्रध्दा वझे, याचे कथा अभिवाचन झाले.
या अधिवेशनाला रत्नागिरी जिल्ह्यातून ग्रंथालय चालक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञानरश्मि वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर , ग्रंथपाल गौरी घाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन हे अधिवेशन यशस्वी केले. खातू मसाले उद्योगचे मालक शाळीग्राम खातू, कार्याध्यक्ष दत्तात्रय गुरव, कार्यवाह मनाली बावधनकर, खजिनदार ज्ञानेश्वर झगडे, सदस्य प्रभुनाथ देवळेकर, संजय मालप, अरुणा पाटील, ज्योती परचुरे, बाबासाहेब राशिनकर , ईश्वरचंद हलगरे, संकेत साळवी तसेच कर्मचारी शामली घाडे, सानिका जांगळी वाचक प्रेरणा लोंढे व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी केले.












