चित्ररथाद्वारे वेंगुर्ले तालुक्यात गावागावात जाऊन देणार व्यसनमुक्तीचा संदेश
वेंगुर्ले l दाजी नाईक :हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. देशभरात असलेल्या बारा ज्योतिर्लिंग स्थळांवर या दिवशी देशभरातील भाविक मोठ्या संख्येने महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. हेच औचित्य साधून प्रजापिता ब्रह्मकुमारी इश्वरीय विश्व विद्यालयाच्या वेंगुर्ले शाखेतर्फे माणिक चौक येथील केंद्रात १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान ‘बारा ज्योतिर्लिंग दर्शन’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. वेंगुर्ले तालुक्यासह आजूबाजूच्या ठिकाणच्या भाविकांना एकाच ठिकाणी देशातील विविध ठिकाणच्या बारा ज्योतिर्लिंग स्थळांचे दर्शन यावेळी घेता येणार आहे.
या उपक्रमांतर्गत प्रजापिता ब्रह्मकुमारीजच्या वेंगुर्ले केंद्रात १२ ज्योतिर्लिंगम दर्शनाचे देखावे बनविण्यात येणार आहेत. या स्थळांवर भाविकांना दर्शनाचा लाभघेता येणार आहे. याशिवाय स्वर्गाचा सीन असलेला चित्ररथ बनविण्यात येणार आहे. हा चित्ररथ वेंगुर्ले तालुक्यातील गावागावात नेण्यात येणार आहे. व्यसनमुक्तीचा संदेशही या चित्ररथाद्वारे देण्यात येणार आहे. सनातन धर्माचे महात्य, सणांचे महत्त्व याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १८ रोजी सकाळी १० वाजता या उपक्रमाचा शुभारंभ माणिक चौक येथील केंद्रावर होणार आहे. यावेळी वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, ब्रह्मकुमारीजच्या सिंधुदुर्ग गोवा विभागाच्या प्रमुख शोभा बेहेनजी, सामाजिक कार्यकर्ते एम. के. गावडे, प्रज्ञाताई परब, तुळस येथील सुजाता पडवळ, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहरप्रमुख उमेश येरम, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी चित्ररथाचाही शुभारंभ करण्यात येणार आहे. १८ रोजी म्हाडा कॉलनी, वडखोल, मठ, कुडाळ तिठा, वेंगुर्ले बंदररोड, गावडेवाडी येथे हा चित्ररथ नेण्यात येणार आहे. १९ रोजी मातोंड, होडावडा, सुभाषवाडी, गोसावीवाडी, कुंभारटेंब, तुळस जैतीर मंदिर येथे, २० रहेमी म्हापण, निवती, खवणे, केळूस, मुणगी तिठा, आंदुर्ले, आवेरा, कोंडुरा, दाभोली तर २१ रोजी अणसूर, मोचेमाड, केरवाडा, शिरोडा व उभादांडा येथे हा चित्ररथ नेण्यात येणार आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील भाविकांनी १२ ज्योतिर्लिंग दर्शन व चित्ररथाचे स्वागत करावे. अधिक माहितीसाठी ९४२२९९८७९९ या नंबरवर संपर्क साधवा, असे आवाहन प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्वरीय विश्व विद्यालयातर्फे वंदना बेहनजी यांनी केले आहे.











