वार्ताहर l पाली :ग्रामीण भागातील महिलांनी आपले हक्क व हक्कांबरोबरच आपली कर्तव्ये ही जाणून घेत आपली प्रगती केली पाहिजे.आताच्या काळात मुलगा, मुलगी हा भेदभाव केला गेला नाही पाहिजे तरीही समाजातील सर्वच स्तरात हा भेदभाव दिसून येत असून तो संपवण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. कारण आज प्रत्येक क्षेत्रात महिला या अधिक सरस ठरत असल्याने आपण मुलींच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्यां श्रद्धा कळंबटे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलने जि.प. शाळा नाणीज नंबर १,गावडेवाडी,गुरव शिवगणवाडी या तीनही शाळांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सामाजिक कार्यकर्त्या व सुप्रसिद्ध समुपदेशक श्रध्दा कळंबटे यांचे महिलांच्या विविध समस्यांवर समुपदेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी
लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलचे अध्यक्ष ॲड.अवधूत कळंबटे , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निशा बेंडल , रिद्धी हतपले, नियती गावडे ,आरोग्य उपकेंद्र नाणीज आरोग्य सेविका चैत्राली भाटकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष मुग्धा रेवाळे, दिक्षा गावडे, वेदिका रेवाळे, उमेद बचत गटांच्या अध्यक्षा माधुरी कांबळे यांसह तिनही शाळांचे मुख्याध्यापक स्मिता पाटील ,वैष्णवी शिवगण, विजय पर्वते, उपशिक्षक मनोजकुमार खानविलकर,उपशिक्षिका स्नेहा ठाकरे उपस्थित होते.
महिलांपैकी एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कौटुंबिक अन्यायाविरुद्ध लगेचच आवाज उठविला पाहिजे असे सांगत कायद्याचा दुरुपयोग करणेही थांबले पाहिजे . यावेळी महिलांशी संवाद साधत त्यांना बोलते करत त्यांच्या समस्या जाणून घेत सुसंवाद साधला.
खानू केंद्राचे केंद्रप्रमुख गोविंद तारवे यांनी आपल्या मनोगतात महिला दिन व महिलांनी जागृत होणे का गरजेचे आहे हे सांगितले.
कार्यक्रमाला शिक्षक, पालक , ग्रामस्थ महिला, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक मनोजकुमार खानविलकर यांनी व आभारप्रदर्शन उपशिक्षिका स्नेहा ठाकरे यांनी मानले.












