बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आवादा कंपनी चर्चेत होती. या आवादा कंपनीतुन पवनचक्की प्रकल्पाचे काम सुरु असलेल्या ठिकाणाहून काही दिवसांपूर्वी चोरी झाल्याची माहिती मिळाली. या चोरी प्रकरणात ‘आवादा’ कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पावर सुरक्षारक्षकांना बांधून ठेवून तेथून तांबे चोरून नेणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र या चोरीमागे वाल्मिक कराडच्या सहकाऱ्यांचा हात असू शकतो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी आवादा कंपनीतील पवनचक्की प्रकल्पावर सुरक्षारक्षकांना बांधून ठेवून तेथून चार चोरांनी तांबे चोरी केले. या प्रकरणानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. शेख यांच्या पथकाने बबन सरदार शिंदे, धनाजी रावजी काळे, मोहन हरी काळे आणि लालासाहेब सखाराम पवार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान या घटनेने वाल्मिक कराडचे सहकारी अजूनही कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.












