मुख्य रस्ताच्या गटारातून टाकलेल्या विद्युत वाहिन्यांच्या कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था, अपघाताला निमंत्रण

उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर

गुहागर l प्रतिनिधी :कोकणातील समुद्र किनाऱ्या लगतच्या गावांना खारट हवामानामुळे विद्यृत वाहीन्यांचे लोखंडी पोल लवकर गंजतात तसेच पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि वादळवाऱ्यामुळे विद्यृत वाहीन्यांच्या पोलांची नेहमीच पडझड होऊन सतत लाईट जाणे अशा अनेक अडचणी उद्भवतात. यावर उपाय म्हणून शासनाच्या धोरणानुसार समुद्र किनाऱ्या लगतच्या गावांना भुमीगत विद्यृत वाहीन्या टाकून त्याद्वारे गावांतील ग्रामस्थांना वीज पुरवठा केला जाणार आहे. हा शासनाचा हेतु जरी चांगला असला तरी सदर कामांचे ठेकेदारांकडून पद्धतशीर पणे काम न करता कामामध्ये हेडसाड होताना दिसते आहे. गुहागर तालुक्यातील मोडकाआगर – वरवेली – पालशेत – अडूर – वेळणेस्वर – साखरी आगर – हेदवी – नरवण तसेच गुहागर आरे – वाकी या प्रमुख रस्त्याची दुरवस्था दिसत आहे.

वास्तविक रस्त्याची साईटपट्टी आणि गटारलाईन सोडून भुमीगत विद्यृत वाहीनी टाकणे अपेक्षित असते. परंतु गेले ६/७ महीने भुमीगत विद्यृत वाहीन्या टाकणाऱ्या ठेकेदारांंकडून चक्क गटारातून आणि साईट पट्टीतून खोदाई करून विद्यृत वाहीन्यां टाकलेल्या आहेत. शिवाय गटारे व साईटपट्टया व्यवस्थित बुजविलेल्या दिसत नाहीत. वास्तविक सदर कामे चालू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारांना योग्य त्या सुचना द्यायला हव्या होत्या. परंतु तसे केले की नाही ? आणि याला कुणाचा वरदहस्त आहे का ? हा खरा तर संशोधनाचा विषय आहे. आता तर सुरवातीलाच अवकाळी पावसाने रस्त्याची दुरवस्था होऊन अनेक ठिकाणे दगड-मातीचा थर रस्त्यावर पसरलेला दिसतो आहे. याची योग्य ती दखल घेऊन उपाय योजना न केल्यास दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनांचे सुद्धा रस्त्यावर घसरून अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही.

गावातील नागरी सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे असते आणि हे काम बहुतांशी ग्रामपंचायतीं मार्फत केले जाते. परंतु अशी अनेक मोठी कामे ग्रामपंचायत किंवा सरपंच यांना न कळविताच वरच्या पातळीवरून परस्पर परवानगी दिली जाते. गावातील ग्रामस्थ मात्र सरपंचांना विचारणा करतात, जाब विचारतात. अशा बाबतीत सरपंचांचा काही दोष नसताना विनाकारण ग्रामस्थांचे बोलणे सरपंचांना ऐकूण घ्यावे लागते की तुम्ही परवानगी कशी दिलीत?

सगळ्या बाबींचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागने वेळीच दखल घेऊन सदर रस्त्याची पाहणी करून संबंधित ठेकेदारांने केलेल्या चुका त्यांना दाखवून खोदलेली गटारलाईन व साईटपट्टया.योग्य प्रकारे पुर्ववत करण्यास बंधनकारक करावे जेणे करून नागरिकांना आणि वाहनांना रस्त्यावरून प्रवास करताना अपघातांपासून वाचायला येईल अशी विनंती उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.