रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे मारुती मंदिर येथील हॉटेल व्यंकटेश येथे विविध महत्त्वाच्या विषयांवरील चर्चासत्र उत्साहात झाले. या चर्चासत्रात एमएसएमई आणि एमएसएमई बेनिफिट स्कीम्स, बिसनेस व्हॅल्युएशन, ग्रीन हाऊस गॅसेस अकाउंटिंग आणि सोसायटी रिडेव्हलपमेंट या व्यवहारावर लागणाऱ्या वस्तू व सेवा कर कायद्यातील तरतुदी या विषयावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक करताना शाखेचे अध्यक्ष सीए मंदार जोशी यांनी वरील विषयांचे महत्त्व सांगितले. प्रथम सत्रात सीए निकिता ओसवाल (पुणे) यांनी एमएसएमई आणि एमएसएमईसाठी केंद्र तसेच राज्य सरकारने जारी केलेल्या बेनिफिट स्कीम्स वर प्रकाश टाकला.
द्वितीय सत्रात सीए ऋषभ शहा (पुणे) यांनी बिसनेस व्हॅल्युएशन कसे करावे आणि त्याचे महत्व आणि पद्धती याबद्दल मार्गदर्शन केले. तृतीय सत्रात सीए मकरंद आठवले यांनी ग्रीन हाऊस गॅसेस अकाउंटिंग ही संकल्पना त्यातील नवीन संज्ञांचा अर्थ आणि त्याचा एमएसएमईवर होणार परिणाम यावर अत्यंत खोलवर विश्लेषण केले आणि यात सीए काय भूमिका बजावू शकतात, याबद्दल मार्गदर्शन केले.
चौथ्या सत्रात रत्नागिरीतील सीए चैतन्य वैद्य यांनी सोसायटी रिडेव्हलपमेंटवर लागणाऱ्या जीएसटी कायद्याच्या तरतुदी आणि या संदर्भात विविध न्यायालयांत आलेल्या विविध निर्णयांचे विश्लेषण केले आणि योग्य पद्धतीने जीएसटी कसा भरावा यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए धनश्री करमरकर यांनी केले. याप्रसंगी रत्नागिरी शाखेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.











