रत्नागिरी | प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात काहीसा ओसरलेला पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे असून, हवामान विभागाने कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना 21 जुलै ते 25 जुलै या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबई वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या पाच दिवसांच्या हवामान अंदाजानुसार, या काळात ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाट परिसरातही पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने नद्या व नाल्यांचे पाणीपातळी वाढू शकते, तसेच भूस्खलन व शहरांत पाणी साचण्याचा धोका असल्याचे सांगितले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कालावधीत
घाटमाथ्यावरून प्रवास टाळावा
नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे
शाळा-कॉलेज प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी
आपत्कालीन सेवांशी संपर्कात राहावे












