सोनुर्ली एसटी बस वेळेत सोडा

उपसरपंच भरत गावकर यांची आगार व्यवस्थापकाकडे मागणी

सावंतवाडी । प्रतिनिधी:सोनुर्ली गावासाठी सावंतवाडी आगारातून सकाळी सव्वा नऊ वाजता सोडण्यात येणारी एसटी बस वेळेत सोडण्यात यावी, अशी मागणी सोनुर्लीचे उपसरपंच भरत गावकर यांनी आगार व्यवस्थापक निलेश गावित यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे बांदा मंडळ अध्यक्ष सचिन बिर्जे उपस्थित होते.

सावंतवाडी एसटी आगाराकडून सोनुर्ली गावासाठी सकाळच्या वेळी सव्वा नऊ वाजता सोडण्यात येणारी एसटी बस गेली कित्येक महिने अनियमित सोडण्यात येत असल्याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तसेच ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. या संदर्भात वेळोवेळी सावंतवाडी आगार व्यवस्थापक आणि एसटी प्रशासनाचे लक्ष वेधूनही काही सुधारणा होत नसल्याने, आज पुन्हा एकदा उपसरपंच भरत गावकर यांनी बांदा मंडळ उपाध्यक्ष सचिन बिर्जे यांच्या समवेत आगार व्यवस्थापक श्री. गावित यांची भेट घेत निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, वेळोवेळी मागणी करूनही सकाळी सव्वा नऊ वाजता सावंतवाडी आगारातून सोडण्यात येणाऱ्या सोनुर्ली एसटी बसेसच्या वेळेत अनियमितता दिसून येत आहे. सदर बस शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गेली कित्येक वर्षे ही बस याच वेळेत सावंतवाडी आगारातून सोडण्यात येत आहे, परंतु अलीकडे या बसेसच्या रूटमध्ये एसटी महामंडळाकडून काहीसा बदल करण्यात आल्याने ही बस अन्य गावातून आल्यानंतर सोनुर्लीसाठी लावण्यात येते. त्यामुळे बऱ्याचदा अन्य गावातूनच सावंतवाडी डेपोत येण्यास या बसेसला विलंब होत असल्याने पुढे सोनुर्ली गावासाठी ही बस उशिराने सोडली जाते. परिणामी या सर्वांचा त्रास गावातील ग्रामस्थांसह शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो.

सदरची बस पूर्वीप्रमाणेच सोडण्यात यावी आणि ती नेहमीच्या वेळेत सोडण्यात यावी, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलनासारख्या मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशारा देखील त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.