माणसाला माणूसपण मिळवून देणारा लोकराजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज- प्रदीप मोहिते

 

चिपळूण (प्रतिनिधी) : समाजातील सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी बोर्डिंग उभारून त्यांच्या शिक्षणासह सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्न करणारे व दलितोद्धारासाठी विशेष प्रयत्न करून समाजातील तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे व जातीजातीमधील भिंती दूर करून सामाजिक समतेच्या माध्यमातून माणसाला माणूसपण मिळवून देण्याचे महान कार्य राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केले, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकराजे होते, असे मत प्रा. प्रदीप मोहिते यांनी मांडले.

डी.बीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. शाहू महाराज यांना बालवयापासूनच मल्लविद्येचे वेड होते, त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व भारदस्त, ताकदवान व रांगडे होते. शाहू महाराज हे शास्त्रीय संगीताचे उत्तम जाणकार असून त्यांनी अनेक कलांना राजाश्रय मिळवून दिला. सर्वसामान्य जनतेच्या उद्धारासाठी व उन्नतीसाठी त्यांनी सर्व क्षेत्रात उत्तुंग कार्य केले. दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे, कारण तत्कालीन परिस्थितीत समाज जाती-जातींमध्ये विभागलेला होता. अशा वेळेस दलित-सवर्ण असा भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी स्वतः दलित समाजातील लोकांना घोडागाडीतून कोल्हापुरातून फेरफटका मारणे, हॉटेल काढण्यासाठी मदत करणे व स्वतः त्या हॉटेलमधे जाऊन चहा पिणे, मोटार ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी देणे, शिकलेल्या दलित व्यक्तींना सरकार दरबारी नोकरी देणे यासारख्या कृतीतून जातीअंतासाठी प्रयत्न केले. केवळ मौखिक आवाहन न करता त्यांनी कृतीतून सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले, म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना लोकोत्तर राजा असे म्हणतात, असे मत त्यांनी यावेळी मांडले. घटनाकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विशेष प्रयत्न केल्याचे व लोकमान्य टिळक यांनाही प्रसंगी मदत केल्याचे दाखले त्यांनी यावेळी दिले. महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, कृषी या सर्वच क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याने शाहू महाराज हे अष्टपैलू राजे होते. त्यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी मोठे कार्य केलेले असून शाहू महाराजांसारख्या महापुरुषांना जाती-धर्मांमध्ये विभागने अनुचित असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्यानंतर महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य केले व महात्मा फुले यांच्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचे कार्य पुढे नेले. त्यामुळे अशा थोर महापुरुषांचा वारसा आपण जपला पाहिजे व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तत्वांचा अंगीकार करून तो दिवस “पुनर्विचार दिन” म्हणून साजरा व्हावा, असा विचार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रा.प्रदीप मोहिते यांनी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित पोवाड्याचे सादरीकरण केले. त्यांच्या अत्यंत प्रभावी सादरीकरणामुळे विद्यार्थी भारावून गेले व त्यांच्यामध्ये सकारात्मकता व प्रेरणा निर्माण झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.सौ स्नेहल कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये थोर पुरुषांच्या चरित्रातून मिळणारे विचार अत्यंत प्रेरणादायी असतात व त्या विचारातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा असे आवाहन यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.माधव बापट, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अनिल कलकुटकी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अरुण जाधव, सहकार्यक्रमाधिकारी प्रा.विठ्ठल कोकणी, वरिष्ठ महाविद्यालयाचे एनएसएस विभाग प्रमुख प्रा. डॉ. उत्तमराव सूर्यवंशी, प्रा. विनायक बांद्रे, प्रा.प्रदीप वळवी, प्रा. सौ. ऋतुजा लोंढे, प्रा.अनिल पुनवतकर, प्रा. कोंडीराम सावरे व कु.सुमित कदम, चैतन्य कुलकर्णी, रणजीत मोरे, निशांत जाधव,यश मते, सुरज सकपाळ, रवी राठोड, तृष्णा मोडक, अपूर्वा शिर्के, शर्वरी मोहिते, अंजली घाग यांच्यासह मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.श्रीराम देवळेकर यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय कु.आयुष आगवेकर यांनी तर आभार प्रदर्शन कु.प्राची तांबे यांनी केले.

फोटो फाईल- सीपीएन२७-१

शाहू जयंती निमित्त कार्यक्रमास उपस्थित मा.प्रा.प्रदीप मोहिते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट व अन्य मान्यवर.