दापोली l प्रतिनिधी: मुंबई कडून माणगाव कडे येणार या मार्गावर माणगाव येथील कळमजे माणगाव ब्रीज कमकुवत झाल्याने १९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे माणगाव परिसरात वाहतूक कोंडी ला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहतुकीमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. माणगावजवळील कलमजे गावाजवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने पुलाला तडे गेले असून सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. त्यामुळे माणगाव- महाड- पोलादपूर तसेच तळकोकणाकडे जाणारी वाहतूक कोलाड-भिरा फाटा-सुतारवाडी-विले-जावठा-निजामपूर मार्गे वळविण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, सततच्या पावसामुळे रोहा तालुक्यातील नद्या-नाले ओसंडून वाहू लागले असून काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतत दक्ष राहून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) वर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.











