पटवर्धन, तगारे, आग्रे, तोडणकर, सावंत, शिंदे यांची विद्यार्थी मुख्यमंत्रीपदी निवड
रत्नागिरी : फाटक हायस्कूलच्या शालेय स्वराज्य सभा उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या विद्यार्थी मुख्यमंत्री पदाची निवडणुक उच्च प्राथमिक गटात अर्णव मकरंद पटवर्धन आणि आराध्या संतोष आग्रे, माध्यमिक गटात अभिराम मिलिंद तगारे आणि धनश्री गिरीश तोडणकर, कनिष्ठ महाविद्यालय गटात निखिल हेमंत सावंत आणि गौरी महेंद्र शिंदे यांनी बहुमताने जिंकली.
उच्च प्राथमिक गटात वास्तवातील निवडणुकीचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टीने, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतमोजणीपर्यंतची सर्व प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणूक प्रक्रियेतील सर्वच भूमिका विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पार पडल्या. मुख्यमंत्रीपदाच्या निवडणुकीसाठी नोटा सहित २१ उमेदवार रिंगणात होते. ४ मतदान केंद्र, १६ मतदान अधिकारी आणि ६९५ थेट मतदारांमधून मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेण्यात आले. अर्णव पटवर्धन (इयत्ता सातवी अ) आणि आराध्या आग्रे (इयत्ता आठवी इ) यांनी मुख्यमंत्री पदाची निवडणूक जिंकली. प्रकाश देवरुखकर, संदीप आखाडे, रामदास पाटील, हर्षदा एकावडे, तीर्था कीर यांनी या निवडणुकीचे नियोजन उत्तम पद्धतीने केले.
माध्यमिक गटात १२ उमेदवारांमधून सहा विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यात आली. मुख्यमंत्रीपदी अभिराम तगारे (१० अ) आणि धनश्री तोडणकर (१० क), क्रीडामंत्रीपदी चिराग धुमाळ आणि जान्हवी भोवड, सांस्कृतिकमंत्री म्हणून सार्थक पंडित आणि पूर्वा जोशी यांची वर्गविद्यार्थी प्रतिनिधींमधून निवड करण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालय गटात निखिल सावंत (बारावी, क) आणि गौरी शिंदे (११ ब) यांची महाविद्यालय विद्यार्थी प्रतिनिधी (जीएस) म्हणून निवड करण्यात आली. क्रीडा प्रतिनिधीपदी प्रज्वल काजरेकर आणि कशिश सनगरे यांची तर सांस्कृतिक प्रतिनिधीपदी साहिल देवरुखकर आणि वैष्णवी इंगळे यांची वर्ग प्रतिनिधींमधून बहुमताने निवड करण्यात आली. शिक्षक वाल्मिक वळवी, दिनेश नाचणकर, रमेश काटकर, वृषाली दळी, योगेश कोलगे यांनी निवडणुकीचे काम पाहिले. निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींचे अभिनंदन मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये तसेच संस्थाध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर व पदाधिकाऱ्यांनी केले.












