जैतापूर वार्ताहर
नाटे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप बांदकर यांच्या विरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव अखेर नामंजूर झाला आहे. राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 13 नोव्हेंबर) संध्याकाळी पाच वाजता नाटे ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेत ठराव मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेले तीन चतुर्थांश म्हणजे नऊ सदस्यांचे समर्थन आवश्यक होते. मात्र, सभेस फक्त आठ सदस्य उपस्थित राहिल्याने आणि सरपंच संदीप बांदकर यांच्यासह अन्य तीन सदस्य गैरहजर राहिल्याने ठराव मंजूर होऊ शकला नाही. परिणामी सरपंचांविरोधातील अविश्वास ठराव नामंजूर झाल्याची घोषणा तहसीलदारांनी केली.
सदर अविश्वास ठराव दाखल करताना सरपंच सार्वजनिक पैशाच्या अफरातफरीमध्ये सामील आहेत. सरपंच आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून ग्रामपंचायतीने लादलेली शासकीय जबाबदारी पार पाडण्यात कुचराई करत आहेत. ग्रामपंचायतीकडून दिलेली सर्व कामे पार पाडताना सरपंच हेका धरून कायद्याची अवज्ञा करत आहेत. सरपंच आपल्या कर्तव्याचे पालन करताना पदाचा गैरवापर करत आहेत असे मुद्दे नमूद करण्यात आले होते.
आजच्या विशेष सभेदरम्यान ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची गर्दी झाली होती. ठराव नामंजूर झाल्यानंतर तहसीलदार विकास गंबरे हे बाहेर पडताना ग्रामस्थांनी “आम्हालाही निर्णय कळवावा” अशी मागणी केली. त्यावर तहसीलदारांनी, “निर्णय ग्रामपंचायती सदस्यांना कळविण्यात आला आहे,” असे सांगितले.
यानंतर सदस्य मकरंद धाकरस यांनी ग्रामस्थांना मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. त्यांनी सांगितले की, “एकूण नऊ सदस्य उपस्थित नसल्यामुळे ठराव मंजूर होऊ शकला नाही. मात्र आमचा लढा इथे संपलेला नाही. आम्ही कायदेशीर मार्गाने पुढील लढा सुरू ठेवणार आहोत,” असे धाकरस म्हणाले.










