गड-किल्ल्यांचे संवर्धन काळाची गरज; महाराजा प्रतिष्ठानचे नागरिकांना आवाहन

खेड (प्रतिनिधी) : अखंड सृष्टीचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले ऐतिहासिक गड-किल्ले आज दुर्लक्षित अवस्थेत असून त्यांच्या संवर्धनाची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर ‘महाराजा प्रतिष्ठान गड-किल्ले संवर्धन’ संस्थेने नागरिकांना पुढे येऊन या ऐतिहासिक वारशाचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
संस्थेच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून दुर्गम भागातील गड-किल्ल्यांचे संवर्धन, पायवाटांची दुरुस्ती, तसेच माहिती फलक उभारण्याचे काम सातत्याने केले जात आहे. यामुळे इतिहास पुढील पिढीपर्यंत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आजही अनेक गडकोट पडक्या अवस्थेत असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
स्वराज्याचे सार असलेले हे दुर्ग केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि इतिहासाचा जिवंत पुरावा आहेत. त्यामुळे या गड-किल्ल्यांचे जतन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. “आपली अस्मिता टिकवायची असेल, तर गड-किल्ले वाचवणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील पिढीला आपण काय वारसा देणार?” असा सडेतोड सवालही संस्थेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विविध संस्था कार्यरत असून त्यांना समाजातून सहकार्य मिळणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपला वेळ देत या मोहिमेत सहभागी व्हावे, तसेच पूर्वजांचा इतिहास जपण्यासाठी ध्येयवादी वृत्तीने पुढे यावे, असे आवाहन महाराजा प्रतिष्ठानने केले आहे.
“जय शिवराय, जय भवानी” या घोषवाक्यासह गड-किल्ल्यांचा वारसा जतन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.