शेतीकामांबाबत कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आगामी काही दिवसांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात ३० मार्च रोजी मध्यम पाऊस, तर ३१ मार्च रोजी काही ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी शेतकऱ्यांसाठी तातडीचा कृषी सल्ला जारी केला आहे.
हवामान अंदाज आणि इशारा
-
३० मार्च: विजांच्या कडकडाटासह वादळ, मध्यम पाऊस आणि ४०-५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
-
३१ मार्च: विजांचा कडकडाट, ५०-६० किमी वेगाने वारा आणि गारपिटीचा इशारा.
-
१ व २ एप्रिल: काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
-
तापमान: या काळात कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
शेतकऱ्यांसाठी मुख्य कृषी सल्ला
१. आंबा व काजू बागायतदार:
-
काढणीस तयार असलेल्या आंब्यांची व काजू बियांची लवकरात लवकर काढणी करून त्या सुरक्षित व झाकलेल्या ठिकाणी हलवाव्यात.
-
नवीन लागवड केलेल्या आंबा व काजू कलमांना, तसेच सुपारी व नारळ रोपांना सोसाट्याच्या वाऱ्यापासून वाचवण्यासाठी काठ्यांचा आधार द्यावा.
-
ढगाळ हवामानामुळे आंब्यावर ‘करपा’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेबची फवारणी केवळ कोरड्या हवामानातच करावी.
२. कडधान्ये व इतर पिके:
-
मोकळ्या जागेत वाळत ठेवलेली कडधान्ये आणि काजू बिया पावसामुळे भिजू नयेत यासाठी तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात.
-
भुईमुगाच्या शेंगा तयार झाल्या असल्यास त्यांची काढणी करून त्या कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात.
-
भाजीपाला (मिरची, वांगी, टोमॅटो) पिकांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी.
३. पशुधन व कुक्कुटपालन:
-
विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना सुरक्षितपणे गोठ्यात बांधून ठेवावे.
-
कुक्कुटपालन शेडच्या खिडक्या झाकून घ्याव्यात, जेणेकरून पक्ष्यांचे पावसापासून संरक्षण होईल.
विशेष सूचना
विजांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी भारतीय हवामान विभागाने विकसित केलेल्या ‘दामिनी’ ॲपचा वापर करावा, असे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे. तसेच, कोणतीही औषध फवारणी करण्यापूर्वी हवामान कोरडे असल्याची खात्री करून घ्यावी. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी विज्ञान केंद्राशी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा.












