मराठी भाषा केवळ संवादाचे साधन नसून आपल्या संस्कृतीची ओळख आहे : अजयराज वराडकर

वेंगुर्ल्यात मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी अध्यापकांचा सन्मान सोहळा संपन्न..

वेंगुर्ले : दाजी नाईक
मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून आपल्या संस्कृतीची ओळख आहे. “भाषा टिकली तर संस्कृती टिकते,” असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष मुक्त पत्रकार अजयराज वराडकर यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले. यावेळी त्यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. अशा सन्मान सोहळ्यांमुळे शिक्षकांना नवी उर्जा मिळून ते अधिक जोमाने कार्यरत राहतात, असे त्यांनी सांगितले.

आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्ला यांच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यरत मराठी अध्यापकांचा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. बॅरिस्टर नाथ पै स्मृती सभागृह, कॅम्प, वेंगुर्ला येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला वेंगुर्ला तालुक्यातील हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षणप्रेमी, विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच सभागृहात मराठी भाषेप्रती असलेली आपुलकी आणि अभिमानाची भावना प्रकर्षाने जाणवत होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिका तथा आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या अध्यक्षा वृंदा कांबळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुक्त पत्रकार अजयराज वराडकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सचिन वालावलकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून वाईल्डलाईफ छायाचित्रकार सुनिलचंद देशपांडे, निवृत बँक अधिकारी सचिन डोणकर, कोमतेश्वर तपकिरे, निवृत्त प्राचार्य डॉ आनंद बांदेकर, आदी उपस्थित होते.

वृंदा कांबळी यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. आनंदयात्री वाङ्मय मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला व या उपक्रमांमध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तर प्रमुख अतिथी सचिन वालावलकर यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि वक्तृत्व याकडे प्रेरित करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या सोहळ्यात वेंगुर्ला तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये मराठी अध्यापन कार्य करणाऱ्या अध्यापकांचा शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सन्मानित शिक्षकांमध्ये राजेश प्रभाकर आव्हाड, आक्काबाई वसंत भवरे, तन्वी उमेश ओटवणेकर (अ. वि. बावडेकर विद्यालय, शिरोडा), साक्षी नरेंद्र वराडकर (आसोली हायस्कूल), श्रद्धा वसंत नाईक, मोहन लाडू जाधव (सरस्वती विद्यालय, आरवली टाक), किशोर शांताराम सोनसूरकर, रेश्मा भालचंद्र चोडणकर (दाभोली न्यू इंग्लिश स्कूल), सुनिल आत्माराम जाधव (रा. धो. खानोलकर हायस्कूल, मठ), अर्जुन भिमाण्णा माळी (ऋषीरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल, आडेली), शैलेश शांताराम तांबे (स. का. पाटील विद्या मंदिर, केळूस), चंद्रशेखर मोहन जाधव (श्री माऊली विद्यामंदिर, रेडी), विजय चंद्रकांत ठाकर (अणसूर पाल हायस्कूल), सतिश बाबूराव चांदणे (न्यू इंग्लिश स्कूल, मातोंड), महेश सीताराम बोवलेकर, मनिषा महादेव खरात (रा. कृ. पाटकर हायस्कूल व रा. सी. रेगे कनिष्ठ महाविद्यालय, वेंगुर्ला), सचिन आनंदराव बिडकर, मनिषा शशिकांत कांबळे (वेंगुर्ला हायस्कूल), दिपक रामचंद्र बोडेकर (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा), सोमनाथ रामा बागूल (अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर, परूळे), भक्ती अवधूत नाईक, निलेश वसंत पेडणेकर (श्री देवी सातेरी हायस्कूल व गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय, वेतोरे), सिद्धी संजय हरमलकर (विद्या निकेतन इंग्लिश स्कूल), पूजा संदीप गावडे (मदर तेरेसा इंग्लिश स्कूल), विशाखा विलास वेंगुर्लेकर (निवृत्त, आसोली हायस्कूल), डॉ. सदाशिव गंगाधर चुकेवाड व राजकुमार काशिनाथ हराळे (खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला), तसेच किशोर वामन नांदिवडेकर (जनता विद्यालय, तळवडे)हर्षला शैलेश करंजेकर( एम.आर. देसाई इंग्लिश मिडियम स्कूल वेंगुर्ला))यांचा समावेश होता.

आनंदयात्री चे स्वप्निल वेंगुर्लेकर, पी. के.कुबल, प्रीतम ओगले यांनी मराठी भाषा गौरवपर कविता सादर केल्या.सन्मानित शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करताना हा सन्मान अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा असून पुढील काळातही विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण करण्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार महेंद्र मातोंडकर यांनी तर आभार आनंदयात्री चे सचिव डॉ. सचिन परुळकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महेश राऊळ, विवेक तिरोडकर, भूमी परूळकर यांनी मेहनत घेतली.