भाट्ये किनाऱ्यावरुन कासवाच्या पिल्लांनी घेतली समुद्रात झेप

रत्नागिरी : 
शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनारी सोमवारी सकाळी कासवाच्या पहिल्या घरट्यामधून बाहेर आलेल्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. भाट्ये समुद्रकिनारी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे यावर्षी कासवांच्ाी घरटी कमी झाली होती.
भाट्ये गावातील कासवमित्र समीर भाटकर यांनी गेल्या काही वर्षापासून भाट्ये समुद्रकिनारी ग्रामस्थांच्या मदतीने आणि वनविभाग व कांदळवन कक्षातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कासवांच्या घरट्यांचे संवर्धन करण्यास सुरुवात केली होती. मागील दोन-तीन वर्ष भाट्ये किनारी कासवांची अनेक घरटी झाली होती. यावर्षी कासवांच्या विणीच्या हंगामावेळीच भाट्ये समुद्रकिनारी बंधाऱ्याचे काम सुरु करण्यात आले होते. त्यामुळे जेसीबी व अन्य यंत्रणांच्या कंपणामुळे कासव अंडी देण्यासाठी किनाऱ्याकडे फिरकलीच नाहीत. अवघी दोन घरटी संरक्षित करण्यात यश आले होते. एक कासव साधरण तीन वेळा अंडी देण्यासाठी येते. मात्र बंधाऱ्या कामाचा परिणाम कासव संवर्धनावर झाल्याचे दिसून आले. यावेळी भाट्ये येथे केलेल्या कासवाच्या घरट्यांमधून पन्नासहून अधिक पिल्ले सोमवारी बाहेर पडली.
कासवमित्र समीर भाटकर यांच्यासह महेश भाटकर, वेदांत देवकर, राजन भाटकर यांनी या पिल्लांना समुद्र किनाऱ्यावर सोडले. यावेळी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या अनेक नागरिकांनी ही पिल्ले समुद्रात जातानाचे दृश्य पाहून, कासव संवर्धन प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले.