आबलोली(वार्ताहर):
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने २०२६ साठी मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. मंडळाच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून ही पुरस्कार योजना सुरु झाली आहे. मधमाशीपालन व्यवसायास गती मिळावी व मधपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने हा उपक्रम सुरु केला आहे. मधमाशीपालनात अनेक वर्ष काम करणाऱ्या यशस्वी मधपाळांना प्रथम, द्वित्तीय, व तृतीय, पुरस्काराने या पुरस्कार योजनेत सन्मानित करण्यात येते. यातील एका पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव आहे. पुरस्काराची रक्कम प्रथम (रु. ११,०००/-), द्वितीय (रु.७,०००/-), तृतीय (रु.५,०००/-), अशी आहे.
दि.२० मे २०२६ रोजी जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून जिल्हा पुणे येथे जाहीर समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. या पुरस्काराची लिंक मंडळाच्या www.mskvib.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात खादी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात नामांकन अर्ज मिळू शकतील असे मंडळाचे श्री. नित्यानंद पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई यांनी सांगितले आहे.
इच्छुकांनी आपले नामांकन दि.०४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात पाठवावे. असे आवाहन मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय, पत्ता- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ,जेल रोड,कुलकर्णी कम्पाउंड बीएसएनएल ऑफिस शेजारी, रत्नागिरी संपर्क क्र.८०८७८६२५१६ येथे संपर्क साधावा असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.












