फोंडाघाट बावीचे भाटले परिसरात रान गव्या- रेड्यांचा मुक्त वावर ! शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर 

भात शेतीची अपरिमित हानी ! फॉरेस्ट खाते हतबल !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : चालू वर्षी तरवा रूजून आल्यानंतर आणि लावणी झाल्यानंतर फोंडाघाट-बावीचे भाटले परिसरातील डोंगरदऱ्यांमधून रान गवेरेडे शेतकऱ्यांच्या शेतात येऊन सध्या शेती उध्वस्त करीत आहेत. लावणी झालेली रोपे खाऊन वाफ्या मध्ये नाचून उरली सुरली रोपेही उध्वस्त करीत आहेत. भात शेती तुडवण्यामुळे गवारेड्या च्या पाऊल खुणा वाफ्या मध्ये उमटल्या आहेत.लगतच्या देवधर धरणाच्या कालव्यापलीकडे असलेल्या डोंगरराईतून रात्री गवेरेडे येऊन रोपे खाऊन नासधुस करीत आहेत.

याबद्दल येतील ग्रस्त शेतकऱ्यांनी १७ जुलै २०२३ रोजी वनक्षेत्रपाल, कणकवली सह संबंधितांना अर्ज करून होणारे नुकसान टाळण्यासाठी गवारेड्या चा तातडीने बंदोबस्त करावा, आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर पंचनामे झाले. शेतकऱ्यांनी आवश्यक असलेली कागदपत्रे ही दिली. मात्र फॉरेस्ट विभागाकडून गवारेड्या च्या बंदोबस्तासाठी कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे शेतकरी उध्वस्त झाल्यानंतर कारवाई होणार का ? याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

ज्ञानदेव येंडे,विनायक येंडे, ज्ञानेश्वर येंदे, राकेश कारेकर, प्रमोद येंडे, विजय पाटकर, अक्षय परब, संतोष सावंत, मारुती मराठे, शशिकांत मराठे, विठोबा येन्दे आणि लगतचे शेतकरी यांची गव्या रेड्यांकडून परिमित हानी झालेली आहे. याबाबत सर्व सोपस्कार पूर्ण झालेले असताना, भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी ठोस प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे…