Monsoon: सप्टेंबरमध्ये पुन्हा परततोय पाऊस, हवामान विभागाची महत्त्वाची बातमी

rain flows down from a roof down

नवी दिल्ली : भारतात १९०१ नंतर ऑगस्ट महिन्यात यावेळेस सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने प्रतीक्षाच करायला लावली. यातच भारतीय हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिली आहे. अत्यंत धीमी झालेल्या पावसाच्या हालचाली सप्टेंबरमध्ये वेगवान होऊ शकतात. अनेक दशकानंतर ऑगस्टमध्ये पावसाची सगळ्यात कमी नोंद पाहायला मिळाली.

हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण -पश्चिम मान्सून या आठवड्यात पुन्हा सक्रिय होऊ शकतो आणि देशाच्या मध्य तसेच दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये पाऊस होऊ शकतो. डिजीटल माध्यमांशी संवाद साधताना भारतीय हवामान खात्याच्या विभागाचे संचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की सप्टेंबरमध्ये सामान्य पाऊस होण्याची शक्यता आहे.

जरी सप्टेंबरमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळला तरी जून ते सप्टेंबर या सत्रात नोंदला गेलेला पाऊस हा सरासरीच्या तुलनेत कमीच राहण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये पाऊस कमी राहण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे भूमध्यरेखीय प्रशांत महासारगात अलनिनोची स्थिती बनणे.

दरम्यान, अल निनोवर उलटा परिणाम करणारे तापमान बनण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे अल निनोचा प्रभाव कमी होईल. यामुळे पूर्व दिशेला वाहणाऱ्या ढगांची हती आणि उष्णकटिबंधीय क्षेत्रात होणारा पाऊस पुन्हा येण्यास कारणीभूत ठरू शकतो.