रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये कोकण कोस्टल मॅरेथॉन हा आगळावेगळा असा प्रयत्न सुवर्णसूर्य फाउंडेशन आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने सुरू केला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रत्नागिरीच्या विकासाकरिता ही मॅरथॉन महत्त्वाची आहे. यामध्ये आतापर्यंत देशभरातील विविध स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. कोकणचे निसर्गसौंदर्य जगभरात पोहोचावे, पर्यटक यावेत व भूमिपुत्रांचा विकास व्हावा, याकरिता ही मॅरेथॉन महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास माजी आमदार बाळासाहेब माने यांनी व्यक्त केला.
सुवर्णसूर्य फाउंडेशन व रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सदस्यांनी बाळासाहेब माने यांची भेट घेऊन त्यांनी स्पर्धेसंबंधीची संकल्पना, माहिती सांगितली. त्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, या स्पर्धेत अनेक जणांनी सहभाग घेतला आहे. प्रसाद देवस्थळी, सुहास ठाकुरदेसाई आणि डॉ. नितीन सनगर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कोकण कोस्टल मॅरेथॉनचे चांगले नियोजन केले आहे. कोकणचे निसर्गसौंदर्य, रत्नागिरीची क्षमता काय आहे, हे जगभरात पोहोचावे व जगभरातले पर्यटक येथे येऊन कोकणचे पर्यटन वाढावे. त्याचा फायदा स्थानिक भूमिपुत्रांना व्हावा. टुरिस्ट असोसिएशन असो वा हॉटेल व्यावसायिक यांना यातून व्यावसायिक संधी मिळतील. ही एक प्रकारची जनजागृती आहे. मुंबई, पुण्यासह भारतात आणि जगभरात विविध प्रकारच्या अशा प्रकारच्या मॅरेथॉन आयोजित केल्या जातात.
कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये ५, १० किलोमीटर आणि २१ किमीची हाफ मॅरेथॉन आहे. रत्नागिरीकरांनी आयोजित केलेली, संपूर्ण कोकणवसियांची असलेली आणि संपूर्ण जगभरातील धावपटू एकदा तरी रत्नागिरीत यावेत, अशा स्वरूपाची ही मॅरेथॉन असावी, हे आयोजकांचं स्वप्न आहे. त्याला आपण एक सर्वसामान्य रत्नागिरीकर म्हणून प्रतिसाद दिला पाहिजे. या स्पर्धेत रत्नागिरीकरांनी जरूर सहभागी व्हावे. जर आपणास काही कारणाने सहभागी होता येत नसेल तर आपण कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या टीमला पाठबळ द्यावे. पाठबळ म्हणजे पैशांच्या रूपात नव्हे तर अन्य लागणारी मदतही करता येईल. या स्पर्धेला थिबा पॅलेस येथे सुरवात होऊन ती भाट्ये किनाऱ्यावर संपणार आहे. यानिमित्ताने रत्नागिरीचे नाव पुन्हा जगाच्या नकाशावर येईल, असा विश्वास बाळासाहेब माने यांनी या वेळी व्यक्त केला.
श्री. बाळ माने म्हणाले की, रत्नागिरीत कोकण रेल्वे येऊन आता २५ वर्षे झाली आहेत. रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून दुपदरीकरण चालू आहे. वेगवान रेल्वेमुळे फक्त चार तासांत मुंबईतून रत्नागिरीत येता येऊ लागले आहे. विमानतळही वर्षभरात सुरू होईल. हा विमानतळ कोस्टगार्डचा आहे. परंतु डोमेस्टिकला त्यांनी परवानगी दिली आहे. त्याकरिता भूसंपादन व अन्य सुविधा दिल्या जाणार आहेत. मुंबई-गोवा महामार्ग होतोय, सागरी महामार्गही होतोय. रत्नागिरीशी सर्व मार्गाने कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. तेव्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील. पर्यटक येण्यासाठी आता कोकण कोस्टल मॅरेथॉन हेसुद्धा एक निमित्त आहे. त्याकरिता पाठबळ द्या, स्पर्धा नक्की यशस्वी होईल.











