मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच आयोजित क्रांतीज्योती लेखणी व आयडॉल ऑफ रत्नागिरी पुरस्कार सोहळा संपन्न

चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत (ता.चिपळूण) या कौटुंबिक सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या महाराष्ट्र शासनाच्या विधवा प्रथा निर्मूलनाच्या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय लेखन स्पर्धा व ज्या ग्रामपंचायती, सामाजिक संस्था, महिला बचत गट आणि समाजसेवक यांना विधवा महिलांच्या कार्य , कर्तृत्वाच्या सन्मानार्थ युगनायिका सावित्रीबाई फुले ‘क्रांतीज्योती लेखणी सन्मान ‘व स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘आयडॉल ऑफ रत्नागिरी ‘ सन्मान २०२३ वितरण सोहळा नुकताच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन, चिपळूण येथे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला. यामध्ये राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत एकूण १० विजेते स्पर्धक, ११ ग्रामपंचायती, ३ सामाजिक सेवाभावी संस्था, १ समाज सेवकाचा समावेश होता.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने आणि राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणे बाबतच्या ठरावानुसार फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जोपासत या कुप्रथेच्या निर्मूलनाच्या जनजागृती करिता, गेली २८ वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण व एड्स आदी क्षेत्रात कार्यरत असलेली रत्नागिरी जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत, (ता.चिपळूण) या संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या विधवा प्रथा बंद ‘ माझे मत’ राज्यस्तरीय लेखन स्पर्धा-२०२३ या शीर्षकांतर्गत स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि विधवा कुप्रथा निर्मुलनाकरिता कार्यरत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायती, सामाजिक संस्था आणि समाज सेवकांचा सन्मान सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन, चिपळूण येथे संपन्न झाला.

यावेळी मुख्य मार्गदर्शक मान्यवर म्हणून रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले, कोकणातील पहिले वृत्तपत्र दैनिक रत्नभूमीच्या मालक/ संपादिका श्रीमती धनश्री पालांडे, रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलचे अतिरिक्त अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, खेड तालुका न्यायालयाच्या सरकारी वकील अँड. स्वाती कदम , यश सिध्दी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष, निवृत्त सुभेदार मेजर दत्ताराम मोहिते, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीचे अध्यक्ष ,चंद्रकांत सावंत, स्वागताध्यक्षा, सौ राजमुद्रा कदम आणि संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम आदी विचारपीठावर उपस्थित होते. या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेतील युगनायिका सावित्रीबाई फुले ‘क्रांतीज्योती लेखणी सन्मान’ २०२३ पुरस्कार प्राप्त विजेते:- निवृत्त विंग कमांडर डॉ.राजेश जोशी (सातारा), अंकिता पंडित (संगमेश्वर), संतोष कुळे (चिपळूण) , दत्ताराम सावरटकर (चिपळूण), श्रीमती मीरा टेके (छत्रपती संभाजी नगर), विकास खराते(लातूर), ज्योती वराळे (संगमेश्वर) , जयवंत चव्हाण (दापोली), सौ. सिद्धी चिंचवलकर (संगमेश्वर), श्रावणी सणस(दापोली) यांचा समावेश होता. या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे परीक्षण संपादिका धनश्री पालांडे (रत्नागिरी) व सामाजिक कार्यकर्त्या अँड.विभावरी रजपूत (चिपळूण) यांनी केले होते. तसेच स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर ‘आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान’ २०२३ या पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती खालील प्रमाणे:- ग्रामपंचायत नाणीज (रत्नागिरी), मुरादपूर (संगमेश्वर),उमराठ (गुहागर), पानवल(रत्नागिरी), भडकंबा (संगमेश्वर), तेरेवायंगणी (दापोली), पाचाड (चिपळूण), वरवेली (गुहागर), आंबलोली (गुहागर), भिले(चिपळूण), नारडुवे (संगमेश्वर) त्याचप्रमाणे तीन सामाजिक संस्था- कुणबी समाज सेवा संघ, नाचणे (रत्नागिरी), पालवी प्रतिष्ठान, पन्हळे (राजापूर) आणि अक्षरमित्र, जुवाठी (राजापूर) तसेच महिला बचत गट- आनंदी महिला बचत गट, पाचाड (चिपळूण) आणि समाजसेवक पुरस्कार प्राप्त कोकणचे गाडगेबाबा मारुती उर्फ काका जोयशी, साखरपा (संगमेश्वर) यांचा समावेश होता.

या पुरस्कार प्रदान सोहळ्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.संघमित्रा फुले यांनी विधवा प्रथा हा एक अत्याचार आहे.

त्याला विरोध करायला शिका. विधवा प्रथा बंद हा समाज -जागृती करिता प्रत्येक घराघरात रुजला पाहिजे. आधी विषयावर सखोल ऊहापोह करून त्यांनी सन्मानित ग्रामपंचायती, सामाजिक संस्था, महिला बचत गट, समाज सेवका समवेत लेखन स्पर्धेतील विजेत्यांचे आभार मानून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच भारत विज्ञानवादी व प्रगतशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी, आजही पतीच्या निधनानंतर विधवा कुप्रथेचे पालन होत आहे. या कुप्रथेला स्त्रीने विरोध केला पाहिजे.या रूढी,परंपरा यांना संपविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केला गेला पाहिजे असे मत कोकणचे पहिले वृत्तपत्र दैनिक रत्नभूमीच्या मालक/संपादिका श्रीमती धनश्री पालांडे यांनी व्यक्त केले. तर रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलचे अतिरिक्त अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी समाजातील प्रचलित असलेली विधवा कुप्रथा बंद विषयी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करून सर्व विजेत्या , पुरस्कार प्राप्त सन्मानर्थीना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधून या प्रचलित अनिष्ट विधवा कुप्रथेच्या निर्मूलनाकरिता सर्वांनी एक पाऊल पुढे येऊन विधवा महिलांनाही इतर महिलांप्रमाणे त्यांच्या भावनांचा मनस्वी आदर करावा. त्यांच्या कार्य, कर्तृत्वाचा सन्मान करावा . पुढे त्यांनी २९ व्या संस्थेच्या वाटचालीकडे पदापर्ण करताना समाजातील विधवा प्रथा निर्मुलनाच्या उपक्रमानंतर पुढील वर्षी आणखी एक सुप्त अवस्थेतील समस्या आहे, जी आजही वयात येणाऱ्या मुलींसह तरुणी ,गृहिणीमध्ये समज-गैरसमज घर करून आहे ही समस्या म्हणजे मासिक पाळी. या मासिक पाळीविषयी समाजात जनजागृती, प्रबोधनात्मक कार्यक्रम व्हावे याकरिता ही संस्था कटिबद्ध असेल असे अभिवचन देऊन त्यांनी सर्व सन्मानर्थीना कोणतेही सहकार्य देण्यासंबंधी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

तर पुरस्कार प्राप्त सन्मानार्थीचे प्रतिनिधी म्हणून मारुती उर्फ काका जोयशी यांनी सन २०२२ पूर्वी म्हणजे २००९ ते २०१७ या कालावधीत विधवा प्रथा निर्मूलनाच्या माध्यमातून केवळ विधवेचे अलंकार उतरवून तीला विद्रुप करणे ,या पलीकडे जाऊन एखाद्या महिलेच्या निधनानंतर तिला अंगणात आंघोळ घालायची नाही, तिचे कपडे बदलू नये.आं घोळ घालायची असेल तर घरच्या बाथरूम मध्ये घालावी. कपडे बदलून बाहेर आणावे. याकडे उपस्थितांचे लक्ष वेधून समाजातील प्रचलित अंधश्रद्धेवर ताशेरे ओढून नियोजित संस्थेला ताकदीनिशी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातून आणि मुंबईसह रत्नागिरी जिल्ह्यातील आणि प्रत्येक तालुक्यातील नामवंत मान्यवरांनी, हितचिंतकांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मातोश्री लक्ष्मीबाई कदम यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास पवार तर प्रस्तावना सौ. राजक्रांती कदम-तांबे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत छोटी मोठी सुभाषित, सुविचार, चारोळ्या सादर करून उपस्थितांची मने जिंकली.