कोकण कोस्टल मॅरेथॉनमधील धावदूतांच्या स्वागतासाठी रत्नागिरीसह ९ गावांमधील गावकऱ्यांची लगबग

रत्नागिरी : कोकणातील तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील, भारताच्या विविध राज्यातील धावपटू सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित पहिल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या निमित्ताने रत्नागिरीत येत आहेत. २०२४ पासून दरवर्षी पहिला रविवार रत्नागिरीला धावनगरी बनवण्याचा संकल्प सर्व रत्नागिरीकरानी केला आहे. यामध्ये कुठेही कमतरता असू नये यासाठी सर्व ग्रामपंचायती आपलं योगदान देत आहेत.

 

ही मॅरेथॉन आपली मॅरेथॉन आहे या भावनेने रत्नागिरी शहरवासियांसह नाचणे, काजरघाटी, सोमेश्वर, चिंचखरी, वेसुर्ले, कोळंबे, फणसोप आणि भाट्ये या गावातील ग्रामस्थ तयारीला लागले आहेत. सर्व धावपटूंचे आपल्या गावात स्वागत कसे करता येईल, आपला सुंदर गाव यानिमित्ताने सर्वदूर कसा पोचवता येईल, यादृष्टीने नियोजन केले जात आहे.

 

नाचणे गावचे सरपंच भैय्या भोंगले, उपसरपंच नीलेखा नाईक, काजरघाटी (पोमेंडी खुर्द) सरपंच भारती पिलणकर, उपसरपंच प्रकाश जाधव, सोमेश्वर सरपंच नाझिया मुकादम, उपसरपंच उत्तम नागवेकर, फणसोप सरपंच राधिका साळवी, उपसरपंच हालमआरा उमेर फणसोपकर, कोळंबे गावचे सरपंच प्रशांत पाटील, उपसरंपच रवींद्र भातडे, भाट्ये सरपंच प्रीती भाटकर, उपसरपंच राजेश पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ या सर्व धावदूतांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.

 

सर्व आबालवृद्धांच्या उत्साह पाहून गणेशोत्सव, शिमगोत्सवाप्रमाणेच हा एक धावकोत्सव साजरा होईल, असा आशावाद सर्व आयोजन करणाऱ्या टीम व्यक्त केला आहे.

 

गावातून धावणाऱ्या धावपटूंचे स्वागत, त्यांची पाणी व्यवस्था, त्यांना हायड्रेशनसाठी लागणारे इलेक्ट्रॉल तसेच कार्बोहायड्रेटसाठी मिळणारे डाएट या गोष्टी पुरवण्याकडे ग्रामस्थांनी विशेष लक्ष द्यावे, असं आवाहन आयोजकांच्या माध्यमातून ग्रामस्थांना करण्यात आले आहे आणि याविषयी ग्रामंचायतीनी सकारात्मक पाऊल उचलले आहे.