महायुतीचा उमेदवार निवडून आणणारच
विकासाची घौडदौड पाहूनच अनेकजण भाजपात दाखल होत आहेत
राजापूर l प्रतिनिधी : राज्यात भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी अशी आमची महायुती आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातुन भाजपाचा उमेदवार द्यावा अशी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र याबाबतचा निर्णय हा दिल्लीतील पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्ड मध्ये होईल आणि महायुतीचा म्हणून या मतदार संघातुन जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणू अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. तर केंद्र व राज्य सरकार करत असलेली कामे आणि वेगाने होणारा विकास पाहूनच आज अनेकजण भाजपात दाखल होत आहेत असेही त्यांनी नमुद केले.
राजापूर तालुक्यातील कोंडये मधलीवाडी प्रवेशद्वार ते सतीचा माळ रस्त्याचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली कामे व राज्यातील महायुतीच्या सरकारने केलेली कामे लोकांसमोर घेऊन जाण्याचे काम आंम्ही करत आहोत, सर्वसामान्यांसाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येणार आहे.
तर राज्यातही महायुतीचे नेते मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेसाठी सरकार काम करत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत राज्यातही आंम्ही ४५ पार जाणार असा दावाही ना. चव्हाण यांनी केला.
यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात उमेदवारीबाबत प्रश्न विचारला असता ना. चव्हाण यांनी या मतदार संघातुन भाजपाला उमेदवारी द्यावी अशी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी आहे. तसा आग्रही आहे, त्याबाबत पक्ष निर्णय घेईल, महायुतीत आमचे नेते याबाबत जे ठरवतील ते धोरण असेल, भाजपाची दिल्लीतील कोअर कमिटी याबाबतचा निर्णय घेईल असे ना. चव्हाण यांनी सांगितले. मात्र महायुतीचा जो कोण उमेदवार असेल त्याला निवडणून आणू असेही त्यांनी यावेळी सांगितले.










