नाम फाउंडेशन आतापर्यंत काढला ५० हजार घनमीटर गाळ

प्रांताधिकारी कार्यालयात रविवारी झाली आढावा बैठक

चिपळूण | संतोष सावर्डेकर :  येथील वाशिष्ठी नदीला गाळमुक्त करण्यासाठी नाम फाउंडेशन अहोरात्र काम करीत आहे. यावर्षी गाळ काढण्याचे काम सुरू केल्यापासून आजपर्यंत ५० हजार घन मिटर इतका गाळ नदी बाहेर काढण्यात आला आहे. या कामाचा रविवारी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच गाळ काढण्याच्या कामाची पाहणी करण्यात आली.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे चिपळूणचे नुकसान सर्वश्रुत आहे. यानंतर चिपळूण बचाव समिती व समस्त चिपळूणकरांच्या माध्यमातून वाशिष्टी व शिवनदीतील गाळ काढण्याच्या मागणीसाठी येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेत आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने इंधन वंदनासाठी सुमारे साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर वाशिष्टी व शिवनदीतील गाळ करण्याच्या कामाला सुरुवात झाली. यामध्ये नाम फाउंडेशनने देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मात्र, यावर्षी गाळ काढण्याच्या कामाला तितकासा वेग येत नव्हता. यामुळे चिपळूण बचाव समितीने पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला. याची दखल घेऊन शासकीय प्रशासकीय स्तरावर बैठका घेण्यात आल्या. यावेळी नाम फाउंडेशनने उर्वरित गाळ काढण्यासाठी सकारात्मकता दर्शवली. यानुसार नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून गाळ काढला जात आहे. यामध्ये आतापर्यंत ५० हजार ५० हजार इतका घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या कामात २ लाख घन मिटर इतका गाळ काढून ठेवण्यात आला आहे. थोड्याच दिवसात हा गाळ अन्यत्र हलवण्यात येणार आहे.

रविवारी नाम फाउंडेशन च्या मल्हार पाटेकर, गणेश थोरात, यांनी प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांची भेट घेतली व नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गाळ किती काढण्यात आला? याची माहिती दिली

यावेळी जलसंपदाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील उपकार्यकारी अभियंता विपुल खोत, नायब तहसीलदार तानाजी शेजाळ आदी उपस्थित होते. नंतर गाळाच्यां कामाची पाहणी करण्यात आली.

यावेळी कोकण समन्वयक समीर जानवलकर, चिपळूण समन्वयक महेंद्र कसेकर, दिगंबर सुर्वे, मंदार चिपळूणकर, शाहनवाज शाह, धनश्री जोशी, रुही खेडेकर, छाया सकपाळ, गुलमूहमद शाह आदी उपस्थित होते.