सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा वाटतो आणि हा हेवा वाटण्यात गैर असं काहीच नाही. खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये गडगंज पगार किंवा शनिवार रविवारच्या सुट्ट्या जणू भ्रमाचा भोपळा असतो.
कारण, प्रत्यक्षात हे क्षेत्र आणि इथं काम करणाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनावर होणारे त्याचे परिणाम पाहता नेमकं कुठं गंडतंय याचा अंदाज येऊन अनेकजण विचारात पडतात.
कागदोपत्री 8 किंवा 9 तासांचं काम फार क्वचितप्रसंगी नियमानुसार निर्धारित वेळेपुरता मर्यादित असतं. अनेकदा सुट्ट्यांना हसतच तिलांजली द्यावी लागते आणि पगारवाढीविषयी काही मंडळींशी न बोललेलंच बरं. वर्षानुवर्षं एखाद्या संस्थेमध्ये काम करूनही पगारात होणारी तुटपुंजी वाढ म्हणजे त्या कर्मचाऱ्याच्या कामाची उपरोधिक पोचपावतीच म्हणावी लागेल. त्यात खाष्ट वरिष्ठ असले की कामाच्या ठिकाणी येणारा प्रत्येक दिवस युद्धाहून कमी वाटत नाही. या अशा परिस्थितीचा सामना सध्या corporate job करणारे अनेकजण करत आहेत.
पुण्यातील एका तरुणानंही काही वर्षांपासून अशा सर्व परिस्थितीचा सामना केला आणि अखेर बॉसच्या जाचाला, नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या नकारात्मकतेचा कंटाळून नोकरी सोडून स्वत:ला जे आवडतं ते करण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडण्याच्या निर्णयापासून ते अखेरच्या दिवसापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी सोपा नसतो, खरंतर नोकरीच्या शेवटचा दिवस असंख्य आठवणी देऊन जाणारा ठरतो. या तरुणानंही हा शेवटचा दिवस खास केला, पण इतक्या अनोख्या पद्धतीत की पाहणारेही पाहतच राहिले. बरं, त्याच्या बॉसच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, पठ्ठ्या चक्क ढोल वाजवत, नाचत या कंपनीला रामराम ठोकून निघून गेला.










