भक्तिने भारलेला कीर्तन सोहळा l पाहावा ‘याचि देही याचि डोळा’ ll

सावंतवाडी । प्रतिनिधी : भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिर कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहाच्या आणि अध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या पश्वभूमीवर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख – इंदुरीकर महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून ज्ञानोबा – तुकारामाचा जयघोष, वैष्णवांचा जनसागर आणि टाळ मृदंगांच्या गजरात उत्साह आणि चैतन्यमय वातावरणात हा अभूतपूर्व सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला.

सात पांच तीन दशकांचा मेळा । एकतत्त्वीं कळा दावी हरी ॥
तैसें नव्हे नाम सर्वमार्गा वरिष्ठ । तेथें कांहीं कष्ट नलगती ॥
अजपाजपणें उलट प्राणाचा । तेथे ही मनाचा निर्धारु असे ॥
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णी पंथ क्रमीयेला ॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा | पुण्याची गणना कोण करी ||

यावेळी निवृत्ती महाराजांनी घेतलेला अभंग उपस्थितांच्या मनाला अध्यात्मिक शांती देऊन गेला. अभंगाचा अर्थ असा की… सात तत्व वैषाशिक गुण कर्म सामान्य विशेष समवाय व अभाव, त्रिगुण, पंचमहाभुते व इंद्रिय दशक म्हणजे शरिराचा मेळा बनतो पण चैतन्य स्वरुपात तो आपली कळा त्यात दाखवतो. हे सर्व तत्वार्थाने क्लिष्ट आहे त्या मानाने हरिनाम सहज सोपे आहे. आपले श्वासोश्वास प्रबंध बनवुन हरिनाम जपायला मनोनिग्रह लागतो. हरिनामाविण जगणे हे जगणे नाही म्हणुन रामकृष्णनामाचा पंथ स्विकारावा असे माऊली सांगतात.