रिगल कॉलेज शृंगारतळी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

 

गुहागर l प्रतिनिधी :नवनवीन उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगार तळी मध्ये नुकताच दहावी व बारावी मध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन सावंत (पोलीस निरीक्षक गुहागर पोलीस स्टेशन), माननीय श्री दीपक विचारे (विभाग प्रमुख कनिष्ठ महाविद्यालय पालशेत) आणि पालक प्रतिनिधी म्हणून मा श्री महेंद्र कदम उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये प्रथम रिगल कॉलेज शृंगार तळीच्या प्राचार्य सौ रेश्मा मोरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्प देऊन स्वागत केले त्यानंतर दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. रिगल कॉलेज शृंगार तळीच्या प्राचार्य सौ रेश्मा मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये उपस्थित दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन रिगल कॉलेजमधील व्यावसायिक कोर्सेसची माहिती दिली त्याचबरोबर त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची माहिती दिली.

त्यानंतर रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. संजयराव शिर्के सर यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले त्यात पूर्वा पाटील TYBBA, सानिया पालकर SYBCA आणि आणि प्रीती झगडे TYBCA यांचा समावेश होता. आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी रिगल कॉलेज मुळे त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली त्याचप्रमाणे कठीण प्रसंगी अडचणींवर मात करून सर्वांगीण विकास झाला असे सांगितले.

मा श्री सचिन सावंत, पोलीस निरीक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यात सकारात्मक दृष्टिकोनातून आपण आपला विकास कसा साधावा, स्पर्धा परीक्षांची तयारी, वर्तमानपत्र व अग्रलेखांचे वाचन, व्यायामाचे महत्त्व, शिक्षणाचे महत्त्व, चांगल्या सवयी, सामाजिक जबाबदारी, कुटुंबाप्रती आर्थिक जबाबदारी, सायबर क्राईम तसेच मुलींनी व स्त्रियांनी आपल्या वैयक्तिक जीवनात सतर्क राहणे गरजेचे आहे तसेच तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत त्यात मोबाईलचा अतिवापर टाळणे, अत्याचार सहन न करणे, चांगल्या संगतीत राहणे, स्वतःवर नियंत्रण ठेवणे, नियोजनात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे. शिक्षण कधीही वाया जात नाही असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर मा श्री दीपक विचारे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. संजयराव शिर्के सर यांचे आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की विद्यार्थ्यांनी या व्यावसायिक शिक्षणाच्या संधीचा फायदा घेऊन स्वतःचा व्यवसाय करावा. रिगल कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देऊन त्यांच्या कौशल्यात वाढ केली जाते व त्यामुळे आज रिगल कॉलेजचे विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यात त्यांनी आत्मविश्वासाने वाटचाल केली पाहिजे व पैसा मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात तसेच शिक्षणामध्ये काही अडचणी असतील तर आपल्या शिक्षकांबरोबर चर्चा केली पाहिजे असे सांगितले. रिगल कॉलेजच्या थीम डिनर विषयी त्यांनी कौतुकास्पद भाष्य केले.

पालक प्रतिनिधी मा. श्री.महेंद्र कदम यांनी विविध रोजगार देणारे व्यावसायिक कोर्सेस ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच शिक्षण घेत असतानाच स्थानिक पातळीवर नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांना आपली फी भरण्याचा मार्ग सुकर करून दिल्याबद्दल रिगल कॉलेजचे आभार मानले व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देत त्यांना मोफत शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास केल्याबद्दल रिगल कॉलेजचे आभार व्यक्त केले.

पुढे कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मा. श्री. शिर्के सर यांनी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम अभिनंदन केले तसेच उत्तम प्रयत्न करून परीक्षेमध्ये सुयश प्राप्त केल्याबद्दल हा सत्कार करण्यात येत आहे असे सांगितले. एखादा व्यावसायिक कोर्स निवडून व आऊट ऑफ बॉक्स विचार करून आपले भवितव्य आपण खूप छान घडवू शकतो असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. पालक व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळेच रिगल कॉलेज आज आपलं कार्य उत्तमोत्तम करत आहे असेही त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राध्यापिका सौ सोनाली मिरगल तसेच आभार प्रदर्शन प्राध्यापक श्री बेर्डे सर यांनी केले.