मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेणार- बाळ माने

 

रत्नागिरी : सध्या मच्छीमारांना घाबरवण्याचे काम काही राजकीय लोक करत आहेत. परंतु मच्छीमारांनी घाबरून जाऊ नये. मी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन. खासदार नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण आपल्यासोबत आहेत. उद्या नारळीपौर्णिमा असून हा नवा हंगाम चांगला जावा, अशी प्रार्थना करतो. जाकीमिऱ्या, काळबादेवी, मिरकरवाड्यातील मच्छीमारांनी एकत्र यावे. मच्छीमारांचा डिझेल परतावा, परवाना, बंदर दुरुस्ती याबाबतचे प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बैठक बोलावून सोडवू, असे आश्वासन माजी आमदार बाळ माने यांनी दिले.

मिरकरवाडा बंदरात श्री. माने यांना मच्छीमारांना बोलावले होते. त्यानुसार आज दुपारी श्री. माने यांनी मच्छीमारांचे प्रश्न ऐकून घेतले. त्यानंतर माने यांनी सांगितले की, पर्ससीन मच्छीमार, गिलनेट आणि पारंपरिक मच्छीमारांमध्ये मतभेद निर्माण करण्याचे काम काही राजकीय नेते करत आहेत. डिझेल परतावा जाणीवपूर्वक कसा उशीरा मिळेल, मच्छीमार माझ्या पायाशी कसे येतील, मग तो प्रश्न सुटेल अशा राजकीय कहाण्या ऐकायला मिळत आहेत. पारंपरिक मासेमारीपासून आज प्रगत तंत्रज्ञानामुळे खोल पाण्यात मासेमारी सुरू आहे. रत्नागिरीची अर्थव्यवस्था मिरकरवाडा, वरवडे, जयगड, कासारवेली, साखरतर नाटे या बंदरांवर व मच्छीमारांवर अवलंबून आहे. परंतु मच्छीमारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

१९७८ साली मिरकरवाडा बंदराचे काम सुरू झाले, पण अजून काम पूर्ण नाही. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला. मिऱ्यावर मानेंची रापण प्रसिद्ध होती. त्यावेळी मिरकरवाड्यातील मच्छीमार भगिनीसुद्धा उदरनिर्वाह करत होत्या. आज डिझेल परतावा नसल्याने मच्छीमार त्रस्त आहेत. मिरकरवाडा येथे समस्या आहेत, गाळ काढलेला नाही, परवाना काम होत नाही. या समस्या सोडवण्यासाठी श्री. फडणवीस, श्री. मुनगंटीवार यांच्याकडे बैठक घेऊ. गरज भासल्यास केंद्रीय मंत्री अमित शहा, मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊ, असे बाळ माने यांनी आश्वस्त केले.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना, नीलक्रांती योजना, जाळी, सोलार यंत्रणा योजना आहेत. खोल समुद्रात मासेमारी करून व त्यावर प्रक्रिया करणारे निर्यातदारही रत्नागिरीत आहेत. पण त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मी १९९९ ते २००४ या काळात आमदार असताना मच्छीमारांच्या समस्या सोडवल्या. मत्स्य विज्ञान विद्यापीठ विधेयक मी मांडले होते. संशोधन, तंत्रज्ञान व विस्तार व्हायला हवा होता. परंतु यातलं काही झालं नाही. एव्हाना मिरकरवाडा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर व्हायला हवे होते. मत्स्य निर्यातूमधून करोडो रुपयांचे परकीय चलन मिळते, परंतु या मच्छीमार बांधवांची निवास व्यवस्था असो, शिक्षण याकडे दुर्लक्ष होत आहे.

या वेळी भाजपा पदाधिकारी मन्सूर मुकादम, श्री. पठाण, मन्सूर जीवाजी, सलीम होडेकर, मसूद मुकादम, वसीम नावडे, सफवान होडेकर, सलीम मजगावकर, मतीन दर्वे, रिहाल साखरकर, मुनीर मजगावकर, मुनाफ मस्तान, जुनेद मजगावकर, पुष्कर भुते आदी उपस्थित होते.