जनतेच्या आशीर्वादाने निलेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील!

सौ. निलमताई राणे यांनी व्यक्त केला विश्वास : महिला, भगिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मालवण कुंभारमाठ येथे महिला मेळावा संपन्न

मालवण | प्रतिनिधी : सर्वसामान्य जनतेचा विचार करून केंद्र व राज्य सरकार अनेक योजना आणत आहे. जनहीताला प्राधान्य देत हे सरकार काम करत आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अधिक गतिमान विकास साध्य करण्यासाठी खासदार राणे साहेब प्रयत्नशील आहेत. यां सोबतच आता मालवण कुडाळचा विकासही निश्चितच गतिमान होईल. माता भगिनी व जनतेच्या आशीर्वादाने निलेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. असा विश्वास सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. निलमताई नारायण राणे यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केला.

दरम्यान, विकासकामे व जनतेची सेवा करताना हा मतदार संघ आदर्शवत असा घडवला जाईल. यासाठी निलेश राणे निश्चितच प्रयत्नशील राहतील. शेतकरी, कष्टकरी, मच्छिमार, व्यापारी यांच्या समस्या सोडवून त्यांची प्रगती साध्य करत असताना येथील प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळाले पाहिजे. यासाठी माझीही आग्रही भुमिका त्यांच्याकडे राहील. असेही सौ नीलम राणे यांनी सांगितले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन निलेश राणे, नितेश राणे, दीपक केसरकर हे मोठया मताधिक्याने विजयी होतील. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल. असा विश्वास सौ. निलम राणे यांनी व्यक्त केला.

मालवण कुंभारमाठ येथील अथर्व सभागृहात सौ. निलमताई राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सौ. निलमताई राणे यांसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, बचत गट महिला अध्यक्षा प्रीती सावंत, गीता चौकेकर, मंगल तांबट, स्मिता लंगोटे, तन्वी सकपाळ यांसह भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, प्रांतिक सदस्या रश्मी लुडबे, माजी जिप अध्यक्षा सुमेधा पाताडे, अस्मिता बांदेकर, माजी सभापती मधुकर चव्हाण, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, आंबडोस सरपंच सुबोधिनी परब, कोळंब सरपंच सिया धुरी, प्रतिमा भोजणे, समीक्षा खोबरेकर यांसह मोठया संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

यावेळी श्वेता कोरगावकर, सुमेधा पाताडे, अस्मिता बांदेकर यांनी मार्गदर्शन केले. विकासाचे व्हिजन असलेले संवेदनशील नेतृत्व असेलेले निलेश राणे यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

अशोक सावंत यांनीही यावेळी विचार मांडले. गेल्या काही वर्षात निलेश राणे सातत्याने यां मतदारसंघात कार्यरत आहेत. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत आहेत. सोबतच शेकडो कोटींचा निधी त्यांनी यां भागात सरकारच्या माध्यमातून आणला आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने जनता त्यांच्या सोबत ठाम असून त्यांचा विजय जनतेने निश्चित केला आहे. अश्या भावना अशोक सावंत यांनी व्यक्त केल्या.

एकूणच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, बचत गट महिला अध्यक्षा प्रीती सावंत व सहकारी यांच्या पुढाकारातून आयोजित यां मेळाव्यास महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी साळेल येथील काही महिलांनी भाजपात प्रवेश केला.