
सदर वीज खांब तातडीने बदलण्याची मागणी
लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील साटवली गांगोवाडी येथे वीज खांब हा गंजून गेल्याने केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. सध्या बुडत्याला काडीचा आधार याप्रमाणे या खांबाला दिलेल्या लाकडी दांड्याच्या आधारामुळे तो कसाबसा तग धरून उभा आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापुर्वी
हा धोकादाय खांब बदलण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांनी केली आहे.
तालुक्यातील साटवली (गांगोवाडी) येथील दत्ताराम दादू तरळ यांच्या घराशेजारी असलेला महावितरण चा खांब गंजून केव्हाही पडण्याच्या स्थितीमध्ये उभा आहे. सदरच्या धोकादायक खांबा बाबत संबंधित महावितरण कार्यालयाला माहिती देऊन सुद्धा याकडे महावितरण कानाडोळा करत आहे. सदरच्या वीज खांबावरून आजूबाजूच्या घरांना लाईन गेलेली असून. काही अंतरावरती मराठी शाळा सुद्धा आहे. सोसाट्याचा वारा किंवा वादळात तो कोसळू शकतो अशी स्थिती आहे.
हा वीज खांब कोसळू नये म्हणून सद्यस्थितीत
त्याला लाकडी दांड्याचा आधार देण्यात आला आहे.
वीजेसंदर्भात काही समस्या निर्माण झाली तर महावितरणचे कर्मचारी सुद्धा या खांबावर चढणार कसे? व दुरुस्त करणार कसे असाच प्रश्न इथे स्थानिक लोकांना पडला आहे. तसेच जर महावितरण चा कर्मचारी या विद्युत खांबावर चढल्यास किंवा त्याच्यातून अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात येत आहे
अशाप्रकारे आधार देऊन उभ्या असलेल्या या वीज खांबाबाबत सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांनी महावितरणचे अधिकारी पाटील यांना मोबाईल वरून याची कल्पना दिलेली आहे. आणि या गंजलेल्या अवस्थेत धोकादायक परिस्थितीमध्ये उभा असलेला खांब तात्काळ बदलावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांनी केली आहे.











