खेड (प्रतिनिधी)तालुक्यातील शिवतर मार्गावर धावणाऱ्या बसफेऱ्यांचे वेळापत्रक बिघडलेले असतानाच जुनाट व नादुरुस्त बसफेऱ्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप होत आहे. उशिराने
मार्गस्थ होणाऱ्या फेऱ्यांबाबत विचारणा करणाऱ्या प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
येथील बसस्थानकातून नुकतीच शिवतर- मुंबई ही लांब पल्ल्याच्या मार्गांवर सोडण्यात आलेली (एम. एच.१४/बी.टी.३००१) बस जुनाट होती. बसचे पत्रे निखळले होते. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. त्यातच उशिराने बसफेऱ्या धावत असल्याने प्रवाशांना तिष्ठत बसावे लागते. याबाबत एसटी प्रशासनाकडे वांरवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन आगाराने निर्धारित वेळेत सुस्थितीतील बस मार्गावर सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.









