खेड (प्रतिनिधी): सकाळपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहर आणि परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील सखल भागात पाणी साचले असून वाहतुकीवरही परिणाम होत आहे.
सतत पडत असलेल्या पावसामुळे खेड तालुक्यातील नद्या आणि नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामध्ये प्रमुख जगबुडी नदी ने इशारा पातळी ओलांडली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका पुलाजवळ दुपारी एक वाजता नदीची पाणी पातळी 5.20 मीटर इतकी नोंदवली गेली आहे. नातू नगर धरण क्षेत्रात दुपारी एक वाजेपर्यंत 97 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे, ज्यामुळे आसपासच्या सखल भागातील नागरिकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. प्रशासनाने नदीकाठच्या भागांमध्ये विशेष लक्ष ठेवले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक बाहेर पडू नये आणि सुरक्षा नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास खेड शहरात देखील पुराचे पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.











