राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील जुवाठी पंचायत समिती गणाची निवडणूक आता रंगतदार वळणावर आली आहे. या गणातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे प्रकाश रघुनाथ भिवंदे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, “जुवाठी गणाच्या सर्वांगीण विकासासाठी जनता खंबीरपणे माझ्या पाठीशी आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी भिवंदे यांनी आपला विकासनामा मतदारांसमोर मांडला आहे.
प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना भिवंदे म्हणाले की, आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे. या बदलत्या काळानुसार जुवाठी गणातील नागरिकांना अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळवून देणे हे माझे मुख्य ध्येय आहे. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजांसोबतच आरोग्य, दर्जेदार शिक्षण आणि पर्यावरणाचे रक्षण या विषयांवर माझा विशेष भर राहील.
प्रकाश भिवंदे यांची ओळख या भागातील एक अभ्यासू आणि कार्यक्षम कार्यकर्ते म्हणून आहे. शासकीय ठेकेदार म्हणून काम करताना त्यांनी अनेक रस्ते आणि दळणवळणाची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली आहेत. तसेच चिरेखाण व्यावसायिक म्हणून त्यांचा जनसामान्यांशी मोठा संपर्क आहे. परिसराची भौगोलिक जाण आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी आपुलकी दिसून येत आहे.
स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व्हावी, जेणेकरून तरुणांना शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. जुवाठी गणाला तालुक्यात एक ‘मॉडेल’ विकसित मतदारसंघ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानादिवशी माझ्या नावासमोर असलेल्या ‘टेबल’ या निशानीचे बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करावे. आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी द्यावी,” असे आवाहन प्रकाश भिवंदे यांनी केले आहे.










