परतीच्या पावसाचे सावंतवाडीत ‘थैमान ‘

शहरात पाणीच पाणी : जनजीवन विस्कळित

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरासह तालुक्यात गुरूवारी परतीच्या पावसाने थैमान घातले. गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी शहरातील जयप्रकाश चौकात पाणीच पाणी झाले होते. अनेक दुकानात पाणी शिरले तसेच नगरपरिषदेच्या मुख्य इमारतीतही पाणी घुसल्याने कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. बॅ.नाथ पै सभागृहाच्या बाजूच्या पायर्‍यांवरून पाणी खाली येताना दिसत होते.

सावंतवाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडीशी उसंत घेतली होती. पावसाला परतीचे वेध लागले अशी चर्चा सुरू होती. मात्र, गुरुवारी सायंकाळी अचानक पावसाने रौद्ररूप धारण केले. साडेचार ते पाच वाजल्यापासून संततधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे येथील जयप्रकाश चौकात पाणीच पाणी झाले होते. या चौकातील अनेक दुकानात पाणी शिरल्याने दुकानांतील सामानाची नासधूस झाली. दुकान मालक उशिरापर्यंत दुकानातील पाणी काढताना दिसत होते.

शहराच्या अन्य भागातही रस्त्यावर पाणी आले होते. नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहाच्या बाजूच्या इमारतीत पावसाचे पाणी आल्याने ते सर्व पायऱ्यांवरून खाली उतरत होते. हाॅलच्या बाजूच्या व्हरांड्यात ही पाणीच पाणी झाले होते. रात्री उशिरा पावसाने विश्रांती घेतली असून जनजीवन सुरळित झाले आहे.