वेंगुर्ला तालुक्यातील दहावी बारावी च्या मुलांना बुधवार पर्यंत दाखले मिळावेत..

अन्यथा शुक्रवारी प्रांत कार्यालयावर घंटा वाजवा आंदोलन :आबा चिपकर

वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ला तालुक्यातील दहावी बारावी च्या मुलांना बुधवार पर्यंत दाखले न मिळाल्यास शुक्रवारी माजी आमदार परशुराम उर्फ (जीजी) उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी येथील प्रांत कार्यालयावर घंटा वाजवा आंदोलन करून प्रांतांना जाग आणू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उर्फ (जीजी) उपरकर समर्थक राजाराम उर्फ (आबा) चिपकर यांनी दिला.

वेंगुर्ला तालुक्यातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे जात व नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्रे 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊनही सावंतवाडीतील प्रांत अधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत. सदर बाबींची चौकशी केल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांची सही झाली नसल्याने वेंगुर्ला तालुक्यातून प्रांताधिकाऱ्यांकडे व्हेरिफिकेशन साठी पाठविण्यात आलेले हे दाखले रखडले आहेत. 20 दिवसांच्या आत हे दाखले विद्यार्थ्यांना आवश्यक असताना 20 दिवस उलटून देखील हे अत्यंत महत्त्वाचे दाखले रखडल्याने पालक व विद्यार्थी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांना हे दाखले वेळेत न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक वर्ष फुकट जाऊ शकते त्यामुळे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील जिल्ह्यातलेच असल्याने त्यांनी वेळीच सदर दाखल्यांचे रखडलेला प्रश्न प्रांताधिकाऱ्यांना समज देऊन सोडवावा अन्यथा आम्ही आमच्या माध्यमातून समज देऊन सोडवू असा थेट इशारा सामाजिक कार्यकर्ते चिपकर यांनी दिला आहे.

काही त्रुटी असल्यास त्या वेळीच पालकांना सुचित करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणासाठी विद्यार्थ्यांचे दाखले प्रलंबित ठेवणे योग्य नाही त्यामुळे प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया घालवू नये अशी अपेक्षा आम्ही व पालक वर्ग करत आहोत. गेल्या 20 ते 25 दिवसांपासून सेतू व महाईसेवा केंद्रातून दहावी बारावी नंतर पुढील शिक्षणासाठी लागणारे नॉन क्रिमिलियर व जातीचे दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी पालकांनी सर्व कागदपत्रांशी अर्ज केलेले आहेत. मात्र दाखला मिळण्याची कमाल मुदत संपून गेली तरी विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले प्रांत कार्यालयातच प्रलंबित असल्याचे स्पष्ट होत आहे, असे चिपकर यांनी सांगितले.