माखजन ला पुन्हा पुराचा फटका,गडनदी चे पाणी शिरले

गडनदी गाळ न काढल्याने बसतोय फटका

माखजन | वार्ताहर :       गेले दोन दिवस सतत च्या पडणाऱ्या पावसाने गडनदीला पुन्हा पूर आला आहे.गडनदीच्या पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत घुसले आहे.गेले १५ दिवस गडनदीचे पाणी कमी जास्त प्रमाणात माखजन बाजारपेठेत येत आहे.आज देखील या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने माखजन बाजारपेठेत अनेक दुकानात हे पाणी शिरले आहे.विशेष म्हणजे या गंभीर बाबीची दखल अद्याप शासकीय यंत्रणेकडून घेतली गेली नसल्याने येथील व्यापारी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे जी परिस्थिती जिल्ह्यात आहे तीच परिस्थिती माखजन बाजारपेठेची आहे.परंतु इथल्या व्यापाऱ्यांच्या होणाऱ्या नुकसाकडे बघायला शासनाला वेळ नाही का असा संतप्त सवाल माखजन चे सरपंच व प्रथितयश व्यापारी महेश बाष्टे यांनी केला आहे.गेले १५ दिवस सतत भरणाऱ्या पावसामुळे येथील व्यापाऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात भिजला आहे.शिवाय धंदा ही झालेला नाही.अशा स्थितीत येथील व्यापाऱ्यांकडे शासनाने लक्ष द्यायला नको का असा जाब महेश बाष्टे यांनी विचारला आहे.

आमदार शेखर निकम यांनी डिझेल च्या खर्चासाठी ९ लाख मंजूर करून आणले.परंतु गाळ काढण्यासाठी आवश्यक मशिनरी उपलब्ध न झाल्याने गडनदी मधील गाळ काढण्याचा विषय तसाच प्रलंबित राहिला आहे.गडनदीच्या पुरामुळे माखजन कासे पुलाच्या दुतर्फा पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे.कासे ,पेंढाबे, नारडूवे,असावे,कळंबुशी,शिरंबे आदी गावांचा सम्पर्क तुटला आहे.गेले १५ दिवस गडनदी लगत असलेल्या करजुवे,धामापूर,माखजन,सरंद,बुरंबाड, कोंडीवरे, आरवली आदी गावातील नदीलागतची भात शेती सतत पाण्याखाली राहिल्याने,शेती कुजून गेली आहे.या भागात पिकांची तात्काळ पाहणी व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

संगमेश्वर तहसिलदार यांनी गडनदी लगतची पुरामुळे झालेली स्थिती प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली पाहिजे. असे व्यापारी व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.