आभार मानण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी सिंधुनगरी येथे सायं ४ वाजता लाडकी माझी बहीण मेळावा होणार.
जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत
सिंधुनगरी बाळ खडपकर
भाजप महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली. राज्यभराप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १,०४, १७४ लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे पैसे जमा झाले व काही दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन ही योजना ऐतिहासिक ठरली. याच पार्श्वभूमीवर राज्याप्रमाणे सिंधुदुर्गात लाडक्या बहिणीचा लाडका देवा भाऊ म्हणून भाजपाचा एक कार्यक्रम होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या महिलांचा ऑनलाईन संवाद होणार आहे. हा कार्यक्रम सिंधुनगरी येथे नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला १८ ऑगस्ट सायंकाळी ४ वाजता शरद कृषी भवन मध्ये होत आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील लाभार्थी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे म्हणून नियोजनाची भाजप पदाधिकाऱ्यांची एक बैठक संपन्न झाली. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सौ संजना सावंत, रणजित देसाई, बाळू देसाई, सावी लोके, दीपलक्ष्मी पडते, राजू परुळेकर, सुप्रिया वालावलकर, सीमा नानिवडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अवघ्या ४० दिवसात राज्यातील महिलांसाठी क्रांतिकारी योजना राबवून ती प्रत्यक्ष अमलात आल्यामुळे टीका करणाऱ्या विरोधकांना चांगली चपराक बसली आहे. विरोधकांनी नकारात्मक भूमिका घेऊन ही योजना राबविणे अशक्य आहे, निवडणुकीवर डोळा ठेवून ही योजना राबविली गेली आहे असे आरोप केले होते. या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर विरोधकांना धास्ती वाटू लागली आहे. असेही प्रभाकर सावंत म्हणाले.
जनता दरबाराचे यश जनताच सांगेल
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कल्पकतेतील जनता दरबार सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवस झाला. जनतेच्या प्रत्येक तक्रारीची दखल प्रशासनाला घ्यावी लागली. जेवढ्या तक्रारी या जनता दरबारात आल्या त्या प्रत्येक तक्रारीच्या पाठपुरावा सुरू झाला. जनतेचे हे प्रश्न सोडविण्याचे बंधन सरकारी अधिकाऱ्यांवर आहे. म्हणूनच पुढचा जनता दरबार पालकमंत्र्यांनी जाहीर केला आहे. या जनता दरबारात जनतेचे सर्वच प्रश्न मार्गी लागणार आहेत. त्यामुळे याचे यश जनताच सांगेल माझ्या जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.












