घराच्या चौकटीत राहूनही समाजकार्य कसे करता येते ह्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सौ.स्वरूपा रवींद्र सामंत. कुणीही तेव्हाच यशस्वीरित्या समाजकार्य करू शकतो, जेव्हा घरात त्यासाठी सर्वार्थाने पाठिंबा आणि प्रोत्साहन देणारी स्वरूपाताईंसारखी गृहकृत्यदक्ष माता कार्यरत असते.
अण्णा उर्फ श्री रवींद्र सामंत आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव ह्यांच्या जीवन कर्तृत्वाचा आलेख सतत उंचावत ठेवण्यात ह्या माऊलीचे मोठे योगदान आहे. स्वरूपाताई म्हणजे प्रेम, आपुलकी, माया, वात्सल्य ह्यांची जणू मूर्तीच. स्वतःची वयपरत्वे येणारी शारीरिक दुखणी बाजूला ठेवून सतत परोपकारी वृत्तीने कुणालाही मदत करणे तसेच येणाऱ्या-जाणाऱ्यांचे हसतमुखाने आदरातिथ्य करणे हेच त्यांचे जीवनव्रत. त्यांचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी ह्या कोकणच्या काहीशा दुर्लक्षित असलेल्या भूमीसाठी दोन तडफदार युवक राजकीय क्षेत्रासाठी घडवले.
अशा ह्या माऊलीला अर्थात सौ.स्वरूपाताई रवींद्र सामंत ह्यांना कुडाळ देशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळ जिजामाता पुरस्काराने सन्मानित करीत आहे. अशी माहिती कुडाळ देशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष योगेश सामंत यांनी दिली.










