वेंगुर्ले l दाजी नाईक :आय टी सी फॉरचून वाशी, नवी मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या दि इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट मिस इंडिया २०२५ या स्पर्धेत मुळ गाव मांगल्याचा मठ, परबवाडी येथील रहिवासी आणि सध्या दहिसर, मुंबई येथे राहत असलेली कु. अदिती परब हिने मानाचा “मिस इंडिया २०२५*” हा प्रतिष्ठेचा किताब पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
परबवाडी येथील कु. अदिती ही श्री. कृष्णा आणि सौ.कृतिका परब यांची कन्या आणि कै.चंद्रकांत परब यांची नात आहे. अदितीला “ग्लॅमरस फेस” हा उपविजेतेपदाचाही बहुमान मिळाला, जो तिच्या आत्मविश्वासपूर्ण आणि मोहक व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आहे. अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेली अदिती ही एक उत्तम नृत्यांगना आणि होतकरू अभिनेत्री आहे. व तिला फ्रेंच भाषेचे ज्ञान अवगत आहे. तिने जे यश संपादित केले त्यामागे तिने घेतलेली मेहनत, सातत्य व नवनवीन येत असलेल्या संकटांचा सामना करत व आई वडिलांचे स्वप्न, तिची इच्छाशक्ती आणि कुटुंबाचा आधार यांमुळेच हे शक्य झाले.
अदितीने दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “हा मुकुट माझ्या आईवडिलांसाठी, कुटुंबासाठी आणि प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीसाठी आहे. त्यांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू पाहणे हेच माझं खरं यश आहे,” आता अदिती भारताचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यासाठी संयुक्त राष्ट्र (USA) ला जाणार असून, आता वेंगुर्ल्याच्या या लेकीचा प्रवास आंतरराष्ट्रीय व्यासपीठाकडे सुरू झाला आहे.












