माखजन |वार्ताहर : श्री. विनायक जोशींच्या ‘धन्य धन्य हो रामराया’ या कथासंग्रहाचे रविवार दिनांक 25 जून 2023 रोजी पिंपळी चिपळूण येथे प्रकाशन झाले. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकच्या भालचंद्र प्रकाशनाचे श्री दर्शन दाणी, चार्टर्ड अकॏंटंट श्री. अमित ओक व व्याख्याते ,कवी ,लेखक श्री मंदार ओक हे उपस्थित होते. महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त निवृत्त मुख्याध्यापक श्री. मुकुंद कानडे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
पिंपळी येथील ‘मधूअनंत’ निवासात संपन्न झालेल्या या आनंद सोहळ्यात श्री.विनायक जोशी यांचे ‘धन्य धन्य हो रामराया’ हे नववे पुस्तक प्रकाशित झाले. प्रस्तावनेत सौ. अनघा पाठक यांनी श्री. जोशी यांच्या लेखन कार्याचा आढावा घेत अनेक अनुभव सांगितले.नुकतेच काव्यसुगंध या राज्यस्तरीय प्रातिनिधिक काव्यसंग्रहात श्री. जोशी यांच्या ‘ मायेचा ओलावा ‘ या कवितेला समाविष्ट करण्यात आले. तसेच पुणे आकाशवाणीवर ‘ चिंतन ‘ हे सदर प्रसारीत होणार आहे अशी माहिती दिली. या पुस्तकाचे प्रकाशक श्री.दर्शन दाणी यांनी या कथासंग्रहातील हलक्या फुलक्या परंतु नेहमीच सकारात्मक संदेश देणाऱ्या कथांचे सुंदर विश्लेषण केले. भालचंद्र प्रकाशनाने नेहमीच व्यावसायिकतेपेक्षा सामाजिक बांधिलकी जपली आहे. दाणी यांच्या व्यवसायातील उदात्त, वैचारिक दृष्टिकोनाने उपस्थितांना प्रभावित केले.
सनदी लेखापाल श्री.अमित ओक म्हणाले – लेखन, वाचन, संगीतातून मिळणाऱ्या आनंदाला मोजमाप नाही. वयाच्या नव्वदीतला त्यांचा उत्साह , लेखन उन्मेष व सकारात्मकता याबद्दल कौतुक आणि आश्चर्य व्यक्त केले. येऊ घातलेल्या दहाव्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य आम्हाला मिळावे अशी इच्छा अमित ओक यांनी व्यक्त केली. प्रसिद्ध व्याख्याते व लेखक श्री मंदार ओक यांनी आपल्या मनोगतात कानडे व जोशी घराण्याशी तीन पिढ्यांपासून असलेल्या स्नेहबंधांच्या आठवणींना उजाळा दिला. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी त्यांनी पुस्तकातील काही कथांचे मार्मिक विवेचन केले. ‘धन्य धन्य हो रामराया’ या कथासंग्रहातील काही कथांमधील संदेश दैनंदिन जीवनात कसे उपयुक्त आहे हे मर्म त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीतून श्रोत्यांसमोर उलगडले. श्री. विनायक जोशी यांच्या आगामी दहाव्या पुस्तकाची प्रस्तावना श्री. मंदार ओक यांनी लिहिलेली आहे. आपल्या अध्यक्षीय मनोगतात श्री.मुकुंद कानडे सर यांनी लेखन वाचनातील आनंद हेच श्री.विनायक जोशी यांच्या आरोग्यपूर्ण दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे सांगून त्यांना स्वरचित कवितेतून शुभेच्छा दिल्या. कानडे परिवाराने लेखन साधनेस जे सहकार्य आणि पाठिंबा दिला त्यामुळेच हे लेखन कार्य शक्य झाल्याचे श्री. विनायक जोशी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. तसेच संपूर्ण आयुष्यात नोकरी करत असताना प्रामाणिकपणा ,निस्वार्थीपणा जपला. याचे श्रेय ते आपले, मामा, मामी, आई, वडील आणि गुरुजनांना नम्रपणे देताना श्रीधर स्वामींचा कृपाशीर्वादाने जगण्याचे बळ मिळाले हे आवर्जून आपल्या मनोगतात सांगितले आहे. याप्रसंगी परिवारातील जेष्ठ सदस्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. श्री. सुनिल कानडे यांनी उपस्थितांचे आभार मानल्यावर कु. सुरश्री कुलकर्णी व सौ. अनघा पाठक यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला चिपळूण परिसरातील साहित्यप्रेमी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ. स्नेहल कुलकर्णी यांनी केले.