रात्री मोटारसायकलने येत असता केला हल्ला
मुलगा बालंबाल बचावला
चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील कळंबट येथे दिनांक २० रोजी रात्री ७.३० च्या सुमारास कळंबट गावचे तंटामुक्ती अध्यक्ष तुषार शिरकर हे मार्गताम्हाणे येथून मोटारसायकलने घरी परत होते. कळंबट बौद्धवाडी येथे आले असता अचानक बिबट्याने रस्त्यावर येत त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्याचा मुलगा मोटारसायकवर मागे बसला होता. बिबट्याने झडप टाकून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण मुलगा बालबाल वाचला आहे. मात्र, त्यास बिबट्याची नखे लागल्याने त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र वहाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पावसामुळे सर्वत्र झाडी वाढली आहे. त्यात रस्त्याच्या कडेलाही झाडी वाढल्याने रात्रीचा प्रवास करताना वन्य प्राण्यांचा त्रास नागरिकांना होत आहे. वन्य प्राण्यांमध्ये बिबटे सध्या रस्त्यावर फिरताना दिसतात. अशीच घटना कळंबट येथे घडली आहे. या गावात नेहमीच बिबट्या ग्रामस्थाना दिसतो. त्याने आता पर्यंत बकऱ्या कुत्रे गुरे यांच्यावर हल्ला केलेला आहे. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, शनिवार २० रोजी या बिबट्याने चक्क गावच्या तंटामुक्त अध्यक्षवरच हल्ला केला. यावेळी त्यांच्या सोबत मोटरसायकल वरती त्यांचा छोटा मुलगा मागे बसला होता. ते मार्गताम्हाणे येथून आपले काम आटोपून घरच्या दिशेने येत होते. ते कळंबट बौद्धवाडी येथे आले असता अचानक या बिबट्याने त्यांच्या हल्ला केला. मात्र, श्री. शिरकर यांनी प्रसंग लक्षात घेत न घाबरता मुलाला धीर देत मोटारसायकल तशीच वेगाने पळवली. जर चुकून घाबरून मोटरसायकल वरून पडले असते तर खूप मोठा अनर्थ घडला असता. मात्र, तरीही बिबट्याने झडप टाकत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. पण तो निष्फळ ठरला. परंतु यात मागे बसलेल्या मुलाला बिबट्याने ओरखडे असल्याने त्याला नखे लागली आहेत. त्याला वहाळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हा हल्ला होण्यापूर्वी त्याच ठिकाणी पाच मिनिटापूर्वी हाच बिबट्या घवाळ गावचे पोलीस पाटील सुनील बळकटे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. जंगलतोडीमुळे आता वन्य प्राणी गावात घुसत आहेत. अनेकदा बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय बिबट्याने गावातील शेतकऱ्याची पाळीव जनावरे, बकऱ्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गावात नेहमीच बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे गावात फिरताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे वन विभागाने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.









