श्री समर्थ भंडारी पतसंस्थेच्या लोटे घाणेखुंट शाखेचा उ‌द्घाटन सोहळा उत्साहात

 ठेवीदारांनी सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करावी- प्रभाकर आरेकर
चिपळूण (प्रतिनिधी) : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या संस्थेच्या शाखा लोटे घाणेखुंट या शाखेचा शुभारंभ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांचे हस्ते तसेच संस्थेचे संचालक मंडळ व घाणेखुंटचे सरपंच संतोष ठसाळे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश कांबळे, उदयोजक श्री विनोदजी खेडेकर व संजयजी आंब्रे तसेच अनेक मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला. या शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना घाणेखुंटचे सरपंच संजय ठसाळे व उपसरपंच नझीर सुर्वे यांनी संस्थेची शाखा सुरू केलेबाबत धन्यवाद देवून संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. तसेच जिजामाता शिक्षण संस्थेचे मोहन वारणकर यांनी शैक्षणिक प्रगतीमुळे अर्थकारण व व्यावसायिकता यांची सांगड घातल्यास प्रगती साधता येत असल्याने श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेसारख्या संस्थेचे स्वागत करून त्याचा उपयोग आर्थिक प्रगतीसाठी केला पाहिजे असे मत व्यक्त केले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश कांबळे व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अधिकारी, उद्योजक विनोद खेडेकर यांनी संस्थेच्या कार्यपध्दतीचे कौतुक करून संस्थेने अल्पावधीत केलेल्या प्रगतीबाबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर व संचालक मंडळाचे कौतुक केले. तसेच उपस्थितांना संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन केले व बँकिंगचे व्यवहाराबाबत मार्गदर्शन केले.
लोटे येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक संजय आंब्रे यांनी संस्थेला शुभेच्छा देताना संस्थेची लोटे सारख्या औद्योगिक क्षेत्रात शाखा सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेने त्यांचे कार्यपध्दती नुसार गरजूंना आर्थिक सहकार्य करून त्यांना सक्षम करणेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. शेवटी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी संस्थेची आर्थिक स्थितीची माहिती देताना आकडेवारीसह विश्लेषण केले. संस्थेचे कामकाज सुरक्षितता, पारदर्शकता, व्यावसायिकता व विश्वासार्हता या तत्वांवर सुरू असून संस्थेचे सभासद, ठेवीदार तसेच ग्राहक यांचे हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. संस्थेच्या एकुण कर्जव्यवहारामध्ये तारणी कर्जाचे प्रमाण ९५ टक्के असून नियमानुसार व योग्यप्रकारे कर्ज वितरण केल्यामुळे संस्थेच्या कर्ज थकबाकीचे प्रमाण नगण्य आहे. संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचे अवलोकन करूनच ठेवीदारांनी आपली गुंतवणूक केली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी मांडले.
या शुभारंभ कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष हेमचंद्र हळदणकर, संचालक सर्वश्री दिलीप मयेकर, अरूण पाटील, सुहास भोसले, पराग आरेकर, विजय जाधव संचालिका सौ. स्मिता आरेकर, श्रीम. प्रज्ञा नरवणकर, सौ. रागिणी आरेकर, संस्थेचा कर्मचारी वर्ग तसेच लोटे घाणेखुंट परिसरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.