भव्य ग्रंथ दिंडीने होणार  रत्नागिरी साहित्य संमेलनाला सुरुवात

भाषा मंत्री ना उदय सामंत यांच्या हस्ते होणार उदघाटन

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था, रत्नागिरी आयोजित मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अनुदानित रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन शनिवार दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी चरित्रकार धनंजय कीर साहित्यनगरी येथे रंगणार आहे. या एकदिवसीय साहित्य संमेलनामध्ये  भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमीना मिळणार आहे. रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सकाळी ७ वाजता भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात येणार असून, कवी केशवसुत, लोकमान्य टिळक, डॅा. बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरुजी, स्वामी स्वरुपानंद, कुसुमताई अभ्यंकर,  विंदा  करंदीकर, गज़लकार बद्दीउजमा खावर या कोकणच्या दिग्गज साहित्यरत्नांची साहित्यसंपदा ग्रंथ चित्ररथाद्वारे या ग्रंथ दिंडीत प्रतिनिधित्व करणार आहेत. नवनिर्माण हाय, एस पी हेगशेट्ये कॅालेज, गोगटे कॅालेज, पटवर्धन हायस्कूल, एडी नाईक स्कूल, पावस हायस्कूल, आविष्कार शाळा , वायडी पवार संस्था या संस्था त्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. राजन गवस या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार असून संमेलनाचे उद्घाटन मराठी भाषामंत्री तथा उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, पद्मश्री मधूमंगेश कर्णिक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, युवा कवी अनंत राऊत, युवा शास्त्रज्ञ  डॉ. प्रदीप मुणगेकर , जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकार, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य जयु भाटकर, शेखर सामंत, भरत गावडे यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने संपूर्ण राज्यभर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून रत्नागिरी जिल्ह्याचे साहित्य संमेलन आयोजित करण्याचा बहुमान नवनिर्माण शिक्षण संस्थेला मिळाला आहे. या संमेलनामध्ये नवनव्या संकल्पना हाती घेण्यात आल्या आहेत. संमेलनपूर्व कार्यक़्रमामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यार्साठी निबंध व काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या.  या उपक्रमांना संपूर्ण जिल्ह्यात मोठा प्रतिसाद  विध्यार्थ्यांनी दिला.

एकदिवसीय साहित्य संमेलनाची सुरुवात उष:काल काव्य मैफिल या विशेष कार्यक्रमाने होणार आहे. खल्वायन संस्था, रत्नागिरी यांच्या माध्यमातून ही मैफिल सकाळी ६ वाजता रंगणार आहे. यानंतर रत्नागिरी शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी जे. के. फाईल ते साहित्य नगरीपर्यंत सकाळी ७.३० वाजता होईल. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बदीउज्जमा खावर सभागृह, माधव कोंडविलकर ग्रंथप्रदर्शन आणि चरित्रकार धनंजय कीर साहित्य नगरी या व्यासपीठांचे उद्घाटन होईल.  संमेलनाचे उद्घाटन भाषामंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता होईल.

सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत सामाजिक कार्यक़र्ती श्रीगौरी सावंत यांची विशेष मुलाखत प्रा. अश्‍विनी कांबळे व संजय वैशपायन घेणार आहेत.
दुपारी 12.30 ते  1.30 या वेळेत चरित्रकार धनंजय कीर साहित्यनगरीमध्ये २१ व्या शतकातील अभिव्यक्ती, व्यवहार आणि साहित्य हा परिसंवाद होणार आहे. यामध्ये विनोद शिरसाट (अध्यक्ष), प्रदीप कोकरे,. सिद्धार्थ देवधेकर, अनिल दांडेकर, इश्वरचंद्र हलगरे, प्रा राजरत्न दवणे, प्रा ज्ञानेश्वर म्हात्रे  यांचा समावेश आहे.
बदीउज्जमा खावर सभागृहात दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत युवा आणि मराठी साहित्याची नवी वाट हा परिसंवाद रंगणार आहे. या परिसंवादात ज्येष्ठ निवेदक जयू भाटकर (अध्यक्ष), सुहास बारटक्के, रश्मी कशेळकर, बाळासाहेब लबडे,  मल्हार इंदुलकर, प्रसाद गावडे, दुर्गेश आखाडे, मदन हजेरी यांचा सहभाग असेल.
दुपारी २.३० ते 3.३० या वेळेत चरित्रकार धनंजय कीर साहित्यनगरीमध्ये डिजिटल युग आणि साहित्यिक जबाबदारी हा परिसंवाद होणार आहे. युवा संशोधक डॉ. प्रतिक मुणगेकर हे या परिसंवादाचे अध्यक्ष असून यामध्ये डॉ. मिनल ओक,  माधव अंकलगे, हेमंत वणजू, अनुया बिर्जे, मयुरी जोशी यांचा सहभाग असणार आहे.
दुपारी २.३० ते ३.३० वा. बदीउज्जमा खावर सभागृहात संगमेश्‍वरी, कोकणी(मुस्लीम) बोलीभाषा आणि संस्कृती हा परिसंवाद डॉ. निधी पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यामध्ये अरुण इंगवले, सारिका आडविलकर, प्रभाकर डावल, समीर गडबडे, अमोल पालये, अलिमीया काझी यांचा सहभाग आहे.

दु. ३.३० ते सायं. ४.३० वा. युवा कवी अनंत राऊत यांची विशेष काव्य मैफल रंगणार आहे. या काव्य संमेलनात संगीता अरबुणे, अमृता नरसाळे, अभिजीत नांदगावकर, कैलास गांधी, अरुण इंगवले, राष्ट्रपाल सावंत, अरुण मोर्ये, अमेय धोपटकर,  आदींचा सहभाग असेल.
सायंकाळी ४.३० वा. साहित्य संमेलनाचा समारोप कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थित पार पडेल. कोकणचा साज, संगमेश्‍वरी बाज या सांस्कृतिक कार्यक्रमाने या साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे.